Vijay Diwas 2023 – देशात आज विजय (Vijay Diwas) दिवसाच्या निमीत्ताने १९७१ च्या युद्धातील शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे नेतृत्व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. १९७१ च्या युद्धामुळे पाकिस्ताचे दोन तुकडे झाले आणि बांगलादेशाची निर्मीती झाली तसेच दक्षिण आशियाचा राजकीय नकाशा पुन्हा बदलला गेला.
१६ डिसेंबर १९७१ रोजी ९० हजाराहून अधिक पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय लष्करापुढे आत्मसमर्पण केल्यानंतर बांगलादेशाचा जन्म झाला. त्यामुळे त्या दिवसापासून भारतात १६ डिसेंबर हा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शूर सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे की, त्यांचे बलिदान आणि दृढ निश्चय देशाच्या इतिहासात कायमचा कोरला जाईल.त्यांनी भारताची कर्तव्यपूर्वक सेवा केली आणि निर्णायक विजयाची खात्री केली. त्यांचे शौर्य आणि समर्पण राष्ट्रासाठी खूप अभिमानाचा स्रोत आहे, असे त्यांनी एक्सवरील पोस्टवर म्हटले आहे.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, १९७१ च्या युद्धात आपल्या सशस्त्र दलांनी केलेल्या निःस्वार्थ बलिदानाचे देश कृतज्ञतेने स्मरण करत आहे. विजय दिनानिमित्त, मी अतुलनीय धैर्य दाखवून ऐतिहासिक विजय मिळविलेल्या शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण करते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील युद्धातील सशस्त्र दलाच्या जवानांच्या “अदम्य साहस आणि शौर्याचे” स्मरण केले.
संरक्षणमंत्र्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण करून शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली वाहिली. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार, संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आणि हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल एपी सिंग. यांनीही यावेळी श्रद्धांजली अर्पण केली.