नवी दिल्ली – बैलगाडा शर्यतीबाबत अखेर अंतिम निर्णय आला आहे. सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे आता बैलगाडा शर्यतीवर कोणतीही बंदी नसणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी तामिळनाडूतील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीच्या निकालाचे एकत्रित वाचन करण्यात आले होते.
याआधी डिसेंबर 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली होती. त्यानंतर या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आली होती. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर दोन्ही बाजू ऐकून घेण्यात आली आहे. त्यानंतर आज सुप्रीम कोर्टाने तामिळनाडू सरकारच्या कायद्याची वैधता कायम ठेवत राज्यातील पारंपारिक जल्लीकट्टूला परवानगी असल्याचे खंडपीठाने नोंदवले. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींचा थरार रंगणार आहे.
महाराष्ट्रात पुन्हा बैलगाडा शर्यत सुरू होणार असल्यामुळे बैलगाडाप्रेमींकडून जल्लोष करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार व अभिनेते अमोल कोल्हेंनी एक व्हिडीओ ट्वीट केला असून, सध्या त्यांचा हा व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणतात.. ‘एका होऊ घातलेल्या राजकीय करिअरची आत्महत्या झाली तरी चालेल, पण बैलगाडा शर्यत सुरू राहिल्याशिवाय गप्प राहणार नाही. एवढा तुम्हा सगळ्यांना शब्द देतो, जय शिवराय..’ असं म्हणताना दिसत आहेत.
बैलगाडा मालक, शौकीन व बळीराजाने काळजात जपलेली या मातीतील बैलगाडा शर्यत कायमस्वरूपी सुरू! हा विजय ऐन बंदीच्या काळात दावणीला बांधलेल्या बैलाला आपल्या मुलांप्रमाणे जीव लावणाऱ्या सर्व बैलगाडा मालकांना समर्पित करतो!शर्यत सुरू करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार!#bailgadasharyat pic.twitter.com/GU0mmCGZeS
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) May 18, 2023
दरम्यान, या सोबतच अमोल कोल्हे यांनी एक पोस्ट देखील शेअर केली आहे. “बैलगाडा मालक, शौकीन व बळीराजाने काळजात जपलेली या मातीतील बैलगाडा शर्यत कायमस्वरूपी सुरू! हा विजय ऐन बंदीच्या काळात दावणीला बांधलेल्या बैलाला आपल्या मुलांप्रमाणे जीव लावणाऱ्या सर्व बैलगाडा मालकांना समर्पित करतो! शर्यत सुरू करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार.!’ असं देखील ते म्हणाले आहेत.