मुंबई – आगामी लोकसभा निवडणूकीसाठी आतापासूनच सर्व राजकीय पक्षांकडून रणनिती आखण्याची तयारी सुरू झाली आहे. 2019मध्ये शिवसेनेने औरंगाबाद आणि अमरावती हे दोन बालेकिल्ले गमाविले आहे. या दोन्ही बालेकिल्ले सर करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून व्युहरचना आखण्यात येत आहे. यात अमरावतीमधून सुषमा अंधारे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर तब्बल 3 दशकांपासून शिवसेनेचे वर्चस्व होते. मात्र 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा इम्तियाज जलील यांनी पराभव केला. जलील यांना मिळालेली वंचित बहुजन आघाडीची साथ आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी घेतलेली तब्बल पावणेतीन लाख मते, यामुळे चंद्रकांत खैरेंचा धक्कादायक पराभव झाला होता.
त्या निवडणुकीत तर कॉंग्रेसच्या उमेदवाराचे डिपॉझिटही जप्त झाले होते. पण आता हा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी ठाकरे गट सज्ज झाला आहे. मात्र 2024च्या निवडणुकीत चंद्रकांत खैरेंना उमेदवारी देणार की अंबादास दानवेंना उमेदवारी मिळणार? यावरून प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.
दुसरीकडे अमरावती लोकसभा मतदारसंघातही 1996 ते 2019 पर्यंत 1998चा अपवाद वगळता शिवसेनेनेच विजय मिळवला होता. 2019च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. आता विद्यमान खासदान नवनीत राणा यांना त्यांच्या मतदारसंघात गुंतवून ठेवण्याची खेळी ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाच्या फायरब्रॅंड नेत्या सुषमा अंधारेंना अमरावतीतून मैदानात उतरवण्याची रणनिती असल्याचे सूत्रांनी सांगितले.
औरंगाबाद आणि अमरावतीतला पराभव ठाकरे गटाच्या जिव्हारी लागला होता. 2019 च्या निवडणुकीत भाजपसोबत युती असूनही शिवसेनेने बालेकिल्ले गमावले होते. आता शिवसेना आणि ठाकरे गट वेगळे झाले आहेत. अशा वेळी महाविकास आघाडीच्या सोबतीने ठाकरे गट बालेकिल्ले पुन्हा ताब्यात घेऊ शकेल का? हे आगामी काळात स्पष्ट होईल.