- 17 पैकी 15 बस रद्द
- दोन बसमध्येही मोजकेच प्रवासी
पिपरी – एरव्ही होळीपूर्वी कोकणात जाण्यासाठी नागरिकांना बसमध्ये जागा मिळत नाही. आधीच आरक्षण करुन ठेवण्यात येते. परंतु करोनाने हे चित्र बदलले आहे. यावर्षी देखील करोनाचा मोठा फटका राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) वल्लभगर आगाराला बसला आहे. होळीच्या निमित्ताने 17 जादा बसचे नियोजन करण्यात आले होते. परंतु त्यापैकी 15 बस रद्द कराव्या लागल्या असून धावत असलेल्या दोन बसला देखील मोजकेच प्रवासी आहेत.
होळी सणानिमित्त दरवर्षी उद्योगनगरीतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी असते. जादा बसचे नियोजन करुनही प्रवाशांना बसमध्ये जागा मिळत नाही. मात्र करोनामुळे सलग दोन वर्षांपासून एसटीला प्रवासी मिळत नसल्याने राज्य परिवहन महामंडळाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. होळी आणि दिवाळी सणानिमित्ताने एसटीला आपला महसूल वाढविण्याची चांगली संधी मिळते. मात्र, सलग दुसऱ्या वर्षीसुद्धा निराशा हाती लागली आहे.
वल्लभनगर आगारातील जादा बसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने नियोजित 17 बसपैकी केवळ दोनच बसला काही प्रवाशांनी बुकींग केले आहे. याव्यतिरिक्त जादा बस धावत नसल्याचे वल्लभनगर आगार प्रमुख स्वाती बांद्रे यांनी सांगितले.