शतकवीर वसंत रायजींची एक्झिट
मुंबई – भारताच्याच नव्हे तर जागतिक क्रिकेटमधील प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधील सर्वांत वयस्कर क्रिकेटपटू वसंत रायजी यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. यंदा 26 जानेवारी रोजी त्यांनी वयाची शंभरी पार केली होती.
26 जानेवारी 1920 साली जन्मलेल्या रायजी यांनी बडोदा (काठियावाड) व मुंबई संघाकडून प्रथम दर्जाचे क्रिकेट खेळले होते. अर्थात, त्यांच्या खेळातील कारकिर्दीपेक्षा त्यांच्या लिखाणाने ते जास्त प्रसिद्ध होते. कर्नल सी. के. नायडू यांच्यावर लिहिलेल्या शहेनशाह ऑफ इंडियन क्रिकेट या पुस्तकामुळे त्याचे नाव क्रिकेट जगतात गाजले.
1940 च्या दशकात त्यांनी 9 रणजी स्पर्धेचे सामने खेळले होते व त्यात 277 धावा केल्या होत्या. विजय मर्चंट यांच्या नेतृत्वाखालील मुंबई संघातूनही त्यांनी प्रथम दर्जाचे क्रिकेट
खेळले होते.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रायजी यांनी विपुल लेखन केले. एक चार्टर्ड अकाऊंटंट असलेले रायजी एक लेखक म्हणून जास्त परिचित होते. रणजीतसिंहजी, दुलीपसिंहजी, व्हिक्टर ट्रम्पर या दिग्गज खेळाडूंवरची त्यांनी लिहिलेली पुस्तके खूप गाजली.
त्यांनी वयाची शंभरी पार केली तेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह वॉ यांनी रायजींच्या घरी जाऊन केक कापून त्यांचा शंभरावा वाढदिवस साजरा केला होता. सचिन व वॉ यांच्यासह बीसीसीआय व जगभरातील क्रिकेटपटूंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
रायजींच्या शंभराव्या वाढदिवशी सचिन व स्टिव्ह वॉ यांनी त्यांची भेट घेतली होती व केक कापून हा शतकोत्सव साजरा केला होता.
आठवणींमध्ये रमणारा खेळाडू – सचिन
या वर्षाच्या प्रारंभी मी स्टिव्ह वॉ याच्यासह त्यांची भेट घेतली होती व त्यांचे वयाचे शतक साजरे केले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजले तेव्हा वाईट वाटले. त्यांच्या कुटुंबीयांना परमेश्वर हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. रायजींची अनेकदा भेट झाली व प्रत्येक वेळी ते क्रिकेटबाबतच्या आठवणी सांगायचे. खेळाडू, क्रीडा लेखक व चार्टर्ड अकाउंन्टंट असूनही आठवणींत रमणारा खेळाडू असे त्यांचे वर्णन करीन, अशा शब्दांत सचिन तेंडुलकरने आदरांजली वाहिली.