माधव विद्वांस
ऐतिहासिक दस्तऐवजांचे अभ्यासपूर्ण संशोधन करून इतिहासाची मांडणी करणारे इतिहासकार वासुदेव बेंद्रे यांची आज जयंती. वा. सी. बेंद्रे यांनी अपार कष्ट घेऊन 17 व्या शतकातील मराठ्यांच्या इतिहासावर संशोधन आणि लेखन करून महत्त्वाचे काम केले म्हणून त्यांना इतिहासाचे भीष्माचार्य असे संबोधले जाते. त्यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1894 रोजी रायगड जिल्ह्यातील पेण येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पेण येथे तर इंग्रजी चौथी ते मॅट्रिकपर्यंत मुंबई येथील विल्सन हायस्कूलमध्ये झाले.
1918मध्ये ते भारत इतिहास संशोधक मंडळात काम करू लागले. त्यांचा पहिला ग्रंथ “साधन चिकित्सा’ हा शिवशाहीच्या इतिहासाचा प्रास्ताविक खंड वर्ष 1928मध्ये प्रसिद्ध झाला. या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी विशेषतः नवीन अभ्यासक आणि संशोधक ह्यांना इतिहास संशोधन आणि लेखन यावर मार्गदर्शन केले आहे. ते जेव्हा पुण्याला आले तेव्हा त्यांचा भारत इतिहास मंडळाशीही संबंध आला.
वि. का. राजवाडे यांना गुरुस्थानी मानून संशोधनाचे काम त्यांनी सुरू केले व आपल्या गुरूंचीच संशोधनाची परंपरा पुढे चालविली. त्यांची इतिहासाची तळमळ पाहून वर्ष 1938मध्ये मुंबईचे माजी गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉन यांच्या इच्छेवरून तत्कालीन मुंबई राज्याचे विधिमंडळ प्रमुख बी. जी. खेर यांनी खास शिष्यवृत्ती देऊन वा. सी. बेंद्रे यांना सरकारी हिस्टॉरिकल रिसर्च स्कॉलर म्हणून इतिहास संशोधनासाठी युरोप व इंग्लंडला पाठवले.
त्यांचे महत्त्वाचे काम म्हणजे त्यावेळी इतिहासाच्या पुस्तकांमध्ये एका परकीय व्यक्तीचे चित्र शिवाजी महाराजांचे चित्र म्हणून छापलेले होते. त्यावर त्यांनी संशोधन करून त्यांच्या परदेश दौऱ्यात शिवाजी महाराजांचे चित्र मिळविले व शिवाजी महाराजांची अधिकृत प्रतिमा म्हणून आज सर्वत्र त्या छायाचित्राला मान्यता मिळाली आहे.
दुसरे म्हणजे छ. संभाजी महाराज यांच्यावर संशोधन व लेखन करण्यासाठी 1918 ते 1958 या 40 वर्षांचा कालावधी त्यांना लागला. संभाजी महाराजांचा धीरोदात्तपणा व हुशारी वाचकांसमोर आणली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, इतिहासप्रेमी यशवंतराव चव्हाण आणि इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. त्यांनी बेंद्रे यांच्याकडून “मालोजीराजे’ आणि “शहाजी महाराज’ हे ग्रंथ तसेच संभाजी महाराजांवरील इतिहास लिहून घेण्यासाठी पाठपुरावा केला होता. बेंद्रे यांनी 57 हून अधिक इतिहास ग्रंथ लिहिले. त्यात प्रामुख्याने मराठेशाहीच्या इतिहासावर प्रकाश टाकला आहे. तसेच संत वाङ्मयावरही लिखाण आहे.
पुणे शहरात, जिथे बेंद्रे यांचे वास्तव्य होते त्या घराला महापालिकेने ऐतिहासिक वारसा ठिकाण म्हणून जाहीर केले आहे. इतिहास विषयावरील उत्कृष्ट प्रबंध लिहिणाऱ्या एका विद्यार्थ्याला, पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाकडून दरवर्षी बेंद्रे यांच्या नावाने सुवर्णपदक दिले जाते. 16 जुलै 1984 रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.