देहरादून – पाच राज्यांतील निवडणूकांची घोषणा झाली असून उत्तराखंडमध्येही आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या आचारसंहितेच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. दरम्यान, बागेश्वरचे भाजप आमदार चंदन राम दास यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बाळकृष्ण यांनी आमदार दास यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन आणि कोविड नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात काँग्रेसचे सरचिटणीस बाळकृष्ण यांनी म्हंटले आहे की, आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर 9 जानेवारी रोजी आमदार चंदन राम दास यांनी अनन गावात लोकांना आकर्षित करण्यासाठी हार्मोनियम, तबला, किट इत्यादींचे वाटप केले. हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे. त्यांनी तक्रारीत लिहिले आहे की, ‘आचारसंहिता लागू झाल्यानंतरही त्यांनी मते गोळा करण्यासाठी गर्दी केली. गावकऱ्यांना वस्तू वाटून त्यांना आमिष दाखवण्याचे काम करत आहेत. अशा स्थितीत नि:स्वार्थ मतदान होणार नाही.”, असे म्हणत काॅंग्रेसचे बाळकृष्ण यांनी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या आरोपानंतर आमदार चंदन राम दास यांनी काँग्रेस महासचिवांचे सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, ‘मी असे कोणतेही काम केलेले नाही, ज्यामुळे आचारसंहितेचा भंग होईल.’ तर एसडीएम आणि रिटर्निंग ऑफिसर हरगिरी यांनी सांगितले की, रविवारी संध्याकाळी त्यांच्याकडे एक तक्रार आली आहे. त्यानूसार तपासासाठी एक पथक अनन गावात पाठवण्यात आले आहे. चौकशीनंतरच पुढील कारवाई केली जाईल.