कमलनाथ; भाजपाचे अनेक आमदार संपर्कात
भोपाळ : मध्यप्रदेशात पोटनिवडणुका झाल्यानंतर त्यामध्ये कॉंग्रेसचे आमदार विजयी होतील आणि मध्य प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे शिवराज सिंह चौहाण यांचे सरकार कोसळेल असा दावा मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे. लॉक डाऊन नंतर सर्व काही सुरळीत झाल्यानंतर मध्यप्रदेशातील 24 जागासाठी पोटनिवडणुका होणार आहेत.
यातील 20 ते 22 जागांवर कॉंग्रेसचे आमदार विजयी होतील असा दावा त्यांनी केला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मला पोटनिवडणुकाबाबत कसलीही चिंता नाही. कॉंग्रेसचे 22 आमदार फुटल्यानंतर मार्च महिन्यामध्ये कमलनाथ सरकार कोसळले होते. भारतीय जनता पक्षाने अनैतिक मार्गाचा अवलंब करून या 22 आमदारांना आपल्याकडे वळविले होते. मात्र जनतेला आणि मतदाराला सर्व काही कळते. सध्या मतदार शांत आहेत आणि परिस्थितीचे निरीक्षण करीत आहेत. भारतीय जनता पक्षाने मतदारांचा विश्वासघात केला आहे असा आरोप त्यांनी केला.
भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते आणि आमदार आपल्या संपर्कात आहेत आणि योग्य वेळी ते कॉंग्रेसला मदत करणार असल्याचा दावाही त्यांनी केला. ग्वाल्हेर व चंबळ या भागातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचे भविष्य काय असेल याबाबत आपल्याला शंका आहे. या भागात कॉंग्रेसचे माजी नेते आणि सध्या भाजपात आलेले ज्योतिरादित्य शिंदे यांचा प्रभाव आहे. कॉंग्रेसमध्ये असल्यामुळे त्यांना मतदान होत होते. आता परिस्थिती बदलली आहे असे कमलनाथ म्हणाले.
मध्य प्रदेशात चाचण्याचे प्रमाण कमी
आपण मध्य प्रदेशामध्ये सत्तेत आल्यानंतर जनतेच्या उपयोगाच्या ज्या योजना सुरू केल्या होत्या. त्या योजनाकडे शिवराज सिंह चव्हाण सरकार दुर्लक्ष करीत आहे. सध्या जनतेची परिस्थिती फारच खराब आहे. सर्वांचे वीज आणि पाणी बिल तीन महिन्यासाठी माफ करण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले. लॉक डाऊनच्या अनुषंगाने निर्माण झालेली परिस्थिती हाताळताना सध्याच्या सरकारला पूर्णपणे पूर्णपणे अपयश आले आहे. चाचण्यांचे प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे मध्य प्रदेशामध्ये करोनाचा विषाणू वेगाने पसरत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या सरकारला त्याचे कसलेही गांभीर्य नाही. स्थलांतरित मजुराचा प्रश्नही या सरकारने व्यवस्थित हाताळला नसल्याचे त्यांनी सांगितले.