मुंबई – देशात करोनाची तिसरी लाट सुरु झाली आहे. महाराष्ट्रातही करोनाच्या दैनंदिन नवीन रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. दररोज आरोग्य अधिकाऱ्यांच्या बैठका सुरु आहे. अशातच आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील करोनाच्या सध्यस्थितीबाबत माहिती दिली आहे. सक्रिय रुग्ण, उपलब्ध व्हेंटिलेट, ऑक्सिजन बेड्स, राज्यातील लसीकरणाचे प्रमाण याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या करोनाचे 1 लाख 73 हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 5 हजार 400 रूग्ण ऑक्सिजनवर आहेत. एकूण रुग्णांपैकी केवळ 2 टक्के रुग्णांनाच ऑक्सिजनची तर 1 टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज भासत आहे. 13 टक्के रुग्णांना सौम्य लक्षणं असून 85 टक्के रुग्ण हे लक्षणविरहीत आहेत. लोकांनी पॅनिक होऊ नये. राज्यात करोनाची तिसरी लाट सुरु झाली असली तरी नागरिकांनी घाबरू नये मात्र काळजी घ्यावी. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
राज्यात सध्या 16 हजार व्हेंटीलेटर बेड्स तर 1 लाख 34 हजार ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत. तसेच जिथे लसीकरण जास्त तिथे मृत्यूचं प्रमाण कमी असल्याचे दिसत आहे. ज्यांचे लसीकरण झाले नाही त्यांनी लसीकरण करून घ्यावे, असे टोपे यांनी सांगितले. तसेच क्वारंटाईन असणाऱ्यांना होम आयसोलेशन किट देण्यात येणार आहे. क्वारंटाइनच्या 7 दिवसांच्या कालावधीत 3 वेळा फोनवरून विचारपूस केली जाईल, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.