लखनौ :- उत्तर प्रदेशच्या अमेठी येथील संजय गांधी रूग्णालयाचा परवाना निलंबित करण्याच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीचे पीलीभीत येथील खासदार वरूण गांधी चांगलेच नाराज आहेत. त्यांनी याच मुद्द्यावरून आपल्याच पक्षाच्या सरकारवर टीका केली आहे. केवळ नावाबद्दल असलेल्या नाराजीमुळे लोकांचे काम बिघडू नये अशा सूचक शब्दांत त्यांनी टीका केली आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मतदारसंघातील हे रूग्णालय आहे. येथे 450 कर्मचारी काम करतात. या रूग्णालयाचा परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून वरूण यांचा त्याला आक्षेप आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी यावर टीका केली होती आणि आता उत्तर प्रदेश सरकारला पत्रही पाठवले आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनाही टॅग केले आहे.
वरूण म्हणाले की, हा केवळ या रूग्णालयात काम करणाऱ्या 450 कर्मचाऱ्यांचा प्रश्न नाही तर येथे उपचारांसाठी येणाऱ्या असंख्य सर्वसामान्य रूग्णांच्या आरोग्य सुविधेचाही प्रश्न आहे. केवळ मानवतेचा दृष्टीकोनच त्यांना न्याय देऊ शकतो. व्यवस्थेचा अहंकार त्यांच्याशी न्याय करू शकत नाही. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार केला जावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
वरूण गांधी गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारला अडचणीत आणणारे प्रश्न विचारत आहेत. ते पक्षात नाराज असल्याच्या चर्चा आहेतच व त्यांच्या पक्षांतराच्या वावड्याही उठल्या आहेत. त्याबद्दल त्यांनी भाष्य केलेले नाही. मात्र आता त्यांच्या पित्याच्या नावाने असलेल्या रूग्णालयाचा परवाना निलंबित केला गेल्यामुळे त्यांची नाराजी उफाळून आली आहे आणि नावामुळेच हे झाले असले तरी त्यामुळे सर्वसामान्यांचे काम न बिघडो म्हणजे झाले अशा आशयाची टिप्पणी वरूण यांनी केली आहे.