मुंबई – आगामी लोकसभा निवडणूकींसाठी सर्व राजकीय पक्षांनी आतापासूनच कंबर कसलेली असून पक्षाची मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. यात सत्ताधारी भाजपकडून लोकसभा निवडणुकांसाठी नवी खेळी खेळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात भाजपने “मिशन 45’साठी मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे.
राज्यातील 48 जागांपैकी 45 पेक्षा अधिक जागांवर भाजपला आपला उमेदवार निवडून आणायचा आहे. त्यामुळे भाजपकडून राज्यातील काही महत्त्वाच्या नेत्यांनाच लोकसभेसाठीची उमेदवारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या व्यक्तीमध्ये लोकसभा जागा जिंकून आणण्याची क्षमता आहे, त्या व्यक्तीलाच उमेदवारी देण्यात येणार आहे, असा निकष भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी ठरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 45 पेक्षा अधिक जागा निवडून आणण्यासाठी भाजपकडून चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, जळगावच्या रावेरमधून गिरीश महाजन, सोलापूरमधून राम सातपुते, ठाण्यातून संजय केळकर किंवा रविंद्र चव्हाण, आणि दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकरांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्र्यांची महाराष्ट्रातल्या दौऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. तसेच, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींमध्ये देखील वाढ झाली असून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने 16 मतदारसंघ निवडले आहेत. त्यापैकी दहा मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य असलेले आहेत.
तसेच, बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे.
18 मतदारसंघात विशेष लक्ष –
बारामती, मावळ, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या मतदारसंघात भाजप आपली ताकद लावणार आहे. यामध्ये 18 मतदारसंघात भाजप विशेष लक्ष देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर भाजपने 12 प्रमुख नेत्यांची या मिशनसाठी निवड केली आहे. प्रत्येक नेत्याकडे दोन लोकसभा मतदारसंघ असे हे गणित आहे. आशिष शेलार, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे हे प्रमुख नेते लोकसभा मतदारसंघांवर लक्ष देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मध्यप्रदेश पॅटर्न काय आहे?
आगामी विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशातील संभाव्य पराभवाचे विजयात रुपांतर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हादसिंह पटेल आणि फग्गनसिंह कुलस्ते, चार विद्यमान खासदार गणेश सिंह, रीती पाठक, उदय प्रताप सिंह, राकेश सिंह आणि भाजप राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांना तिकीट दिले आहे.
मध्य प्रदेशातील 20 वर्षांच्या सत्तेमुळे तयार झालेला सत्ताविरोधी वातावरण आणि संभाव्य पराभवाचा धोका ओळखून भाजपने सोमवारी आपल्या सर्व वरिष्ठ नेत्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करताना अनेक आश्चर्यकारक निर्णय घेतले आहेत. मध्य प्रदेशात भाजपच्या सहा मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांना विधानसभेची तिकिटे देण्यात आली आहेत.
केंद्रीय कृषिमंत्री आणि मध्य प्रदेशातील भाजपच्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री तोमर यांना दिमनी येथून, पटेल यांना नरसिंहपूरमधून, कुलस्ते यांना निवासमधून आणि विजयवर्गीय यांना इंदूरमधून तिकीट देण्यात आले आहे.
दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीतील एकही जागा गमवावी लागू नये यासाठी भाजपकडून मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी बड्या नेत्यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातही लोकसभेसाठी मोठ्या नेत्यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.