पुणे – गणेशोत्सव संपताच पुणेकरांनी नॉन-व्हेज पदार्थांवर ताव मारण्यास सुरूवात केली आहे. सामिष पदार्थांच्या खवय्यांकडून मासळी, मटण आणि चिकनची मागणी वाढली आहे. पदार्थांनुसार 20 ते 50 टक्क्यांनी मागणी वाढली आहे. नागरिकांनी शुक्रवारी (दि.29) हॉटेलमध्ये जाऊन खाण्यास पसंती दिली. तर, शनिवारी (दि.30) हॉटेलमध्ये गर्दी होतीच. पण, नागरिकांनी घरीही बेत आखले होते. रविवारी (दि. 1 ऑक्टोबर) ही मागणी कायम राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
वाढलेल्या मागणीविषयी गणेश पेठ येथील मासळी बाजारातील व्यापारी ठाकुर परदेशी म्हणाले की, गणेशोत्सव संपला आहे. काही दिवसांनी नवरात्रोत्सव सुरू होणार आहे. या कालावधीत मासळी खाण्यास नागरिक पसंती देत असतात. गणेशोत्सवानंतर सर्व प्रकारच्या मासळीची मागणी 50 टक्क्यांनी वाढली आहे. प्रकारांनुसार मासळीच्या भावात 10 ते 30 टक्के आवक झाली.
शुक्रवारी हॉटेल व्यावसायिकांकडून मागणी होती. सामान्यता शनिवारी मासळीला कमी मागणी असते. मात्र, गणेशोत्सनंतर आज (शनिवारी) हॉटेल व्यावसायिकांसह घरगुती ग्राहकांकडून मोठी मागणी होती. गणेश पेठ येथील मासळी बाजारात तब्बल 15 ते 20 टन मासळीची आवक झाली. उद्या (रविवारी) आणखी आवक होणार आहे.
मटण विक्रेते संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे म्हणाले, गणेशोत्सवानंतर मटणाला मागणी वाढली आहे. उत्सवाच्या तुलनेत 20 टक्क्यांनी मागणी वाढली आहे. हॉटेल व्यावसायिकांकडून मागणी जास्त आहे. घरगुती ग्राहकांकडून कमी मागणी आहे. अनेकांच्या घरात पित्रांनी जेवण केल्याशिवाय मटणाचे खालले जात नाही. त्यामुळे घरगुती ग्राहकांकडून तुलनेने कमी मागणी आहे.
बोकड, बोलाई, खिम्याची विक्री 700 रुपये किलो भावाने होत आहे. तर, कलेजीला 740 रुपये भाव मिळत आहे. चिकन विक्रेते रुपेश परदेशी म्हणाले, मागील दोन दिवसात गणेशोत्सवाच्या कालावधीपेक्षा सुमारे 30 टक्क्यांनी विक्री वाढली आहे. उद्या (रविवारी) मागणी आणि भावात वाढ होण्याची शक्यता आहे. चिकनला सध्या किलोस 220 रुपये भाव मिळत आहे.