पुसेगाव (प्रतिनिधी) – कृषी उत्पादन क्षेत्रामध्ये जमिनीचे आरोग्य हा महत्वाचा घटक आहे. जमिनीतील कर्ब वाढीसाठी कंपोस्ट व गांडुळ खताचा वापर केल्याने कर्ब व नत्र यांचे प्रमाण संतुलित राहून उत्पादन वाढीवर याचा चांगला परिणाम जाणवतो, असे प्रतिपादन सातारा उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी केले.
उंबरमळे (ता. खटाव) येथील गांडुळखत निर्मिती युनिटच्या पायाभरणी कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. कृषी विभागाच्यावतीने कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहचविणे या अंतर्गत खरीप हंगाम नियोजनानुसार बियाणे उगवण क्षमता चाचणी, हुमणी कीड नियंत्रण, बांधावरील खत वाटप, “मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवड योजनांच्या अमंलबजावणीसाठी सातारा उपविभागात बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. उंबरमळे येथील कार्यक्रमावेळी तालुका कृषी अधिकारी अरुण जाधव, मंडल कृषी अधिकारी सचिन लोंढे, कृषी पर्यवेक्षक मुंकूद म्हेत्रे, नामदेव कोळेकर, कृषी सहाय्यक नीलेश किरतकुडवे उपस्थित होते.
कृषीअधिकारी वेताळ म्हणाले, रासायनिक खतांचा बेसुमार वापर, त्यांच्या वाढत चाललेल्या किंमतीमुळे उत्पादन खर्च वाढत चालला असून मातीतील कर्ब, नत्रांचे प्रमाण अतिशय अल्प असून त्याचा परिणाम जमिनीचे आरोग्य बिघडविण्यावर होत आहे.