वाई, (प्रतिनिधी) – जन्मापासून लयापर्यंत साथ देत ते जल. अगदी आईच्या गर्भात असल्यापासून पाणी आपलं रक्षण करत आहे. आता आपण पाण्याचं रक्षण करण्याची गरज आहे. ‘जलोदेव भव’ अस म्हणत जलरक्षक होण्याचा संकल्प आज प्रत्येकानेच करायला हवा असे आवाहन समाजसुधारक व कलाकार मकरंद टिल्लू यांनी केले.
लोकमान्य टिळक संस्था संचालित १०८ व्या वसंत व्याख्यानमालेच्या आठव्या पुष्पात ‘१०० कोटी लिटर पाणी वाचवणाऱ्या माणसाची टिल्लू गोष्ट’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कवी, लेखक व विद्यार्थीप्रिय शिक्षक राजेश भोज हे होते.
मकरंद टिल्लू म्हणाले, “मी राबवत असलेल्या जलमोहिमेच्या आज २२५ हून अधिक शाखा आहेत. तसेच २५ हजाराहून अधिक सदस्य आहेत. ही गोष्ट फक्त एका माणसाची नाही. ही गोष्ट आहे पाणी वाचवू इच्छिणाऱ्या साऱ्यांचीच. या गोष्टीची सुरुवात २०१२ च्या बीड-लातूर मधील दुष्काळापासून झाली. यावेळी तेथील सुकलेले धरण पाहून मला दुःख झाले तेव्हाच जलरक्षणाची प्रतिज्ञा मी घेतली.
ते पुढे म्हणाले, पाण्याची बचत करायची असेल तर चार बदल करावे लागतात. त्यातला पहिला म्हणजे सामाजिक सवयीत बदल. यासाठी मी हॉटेल व्यवसायापासून सुरुवात केली. हॉटेलमध्ये प्रचंड पाणी वाया जातं. ग्राहकाला ग्लास भरून पाणी न देता तेथील जार मध्ये पाणी भरून ठेवणे व ग्राहकाला हवे तेवढे त्याचे त्याने घेणे हा प्रकल्प आम्ही राबवायला सुरुवात केली. बघता बघता एका वर्षात ७०० हून अधिक हॉटेल्सनी या प्रकल्पात सहभाग घेतला व ७० टक्के पाण्याची बचत झाली.
दुसरा बदल म्हणजे व्यक्तिगत सवयींमध्ये बदल. याची सुरुवात स्वतःपासूनच करावी लागते. तिसरा बदल म्हणजे गळती थांबवा. महाराष्ट्रात असंख्य तुटलेले, गळणारे, तोटी नसलेले नळ आहेत. या एका नळातून वर्षभरात लाखो लिटर पाणी वाहून जात. हे थांबवण्यासाठी विद्यार्थ्यांना, लहान मुलांना यात सहभागी करून घेतलं. आजपर्यंत आम्ही ३० हजाराहून अधिक नळदुरुस्त केले आहेत.
राजेश भोज यांनी जलरक्षणाचे महत्त्व आणि गरज अधोरेखित केली. सौ. सुनीता कळसे यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. शिवाजी कदम यांनी आभार मानले.
सोनगीरवाडीचे ग्रामस्थ संदीप माने यांनी या व्याख्यानाचे प्रयोजन केले होते. यावेळी पुणेचे नवचैतन्य हास्य योग्य परिवाराचे विश्वस्त प्रमोद ढेपे, जयंत दशपुत्रे, ज्ञानदीपचे दिलीप चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
गळती मुक्त भारत करण्याचं आमचं ध्येय
चौथा बदल म्हणजे जलपुनर्भरण. ही मोहीम राबवत असताना अनेक प्रसंगांमुळे अधिक हुरुप आला. असा एक प्रसंग म्हणजे एका वयस्कर गृहस्थांनी आपल्या ७५वा वाढदिवस नळतुला करून साजरा केला. लोक अनाथ मुलांसाठी काम करतात मी अनाथ नळांसाठी कार्य करतो.
गेली बारा वर्ष मी चालवत असलेली संस्था कॅशलेस आहे. आम्ही मदत स्वीकारतो ती फक्त श्रमदान, प्लंबरदान, नळदान आणि व्याख्यान या स्वरूपातच. कारण व्याख्यानमाला हे परिवर्तनाचे केंद्र आहे. गळती मुक्त शाळा, वस्ती, शहर ते गळती मुक्त भारत करण्याचं आमचं ध्येय आहे.”