सातारा, (प्रतिनिधी)- गुरुवार बाग परिसरातील मेळवणे टाकीचा पाणी वितरणाचा व्हॉल्व्ह तुटल्याने लाखो लिटर पाणी गुरुवार बागेतून वाहून वाया गेले. जवळपास दोन लाख लिटर पाणी बागेतून वाया गेल्याने बागेतील पायऱ्यांवर चक्क धबधबा अवतरला होता.
पालिकेच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांना गेले दोन दिवस पाणी मिळाले नाही, याविषयी नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
सातारा शहराचा पाणीपुरवठा सक्षमतेने कधीच होत नाही. वितरण टाक्या मजबूत असल्या तरी वितरण नलिकांची दुरवस्था असल्याने नेहमीच शहापूर व कास योजनेला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो.
गुरुवारी सुद्धा तसेच घडले. गुरुवार बागेतील मेळवणे टाकीचा व्हॉल्व्ह तुटल्याने प्लेट अडकून पडली आणि लाखो लिटर पाणी गुरुवार बागेच्या पायऱ्यावरून वाहून गेले. सकाळी बागेत फिरायला येणाऱ्या नागरिकांनी या घटनेविषयी आश्चर्य व्यक्त केले.
एकीकडे ऐन उन्हाळ्याचा तडाखा सुरू असताना पाण्याची टंचाई आहे आणि दुसरीकडे पालिकेच्या गलथान कारभारामुळे कासचे लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
या गलथान कारभाराविषयी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. केसरकर पेठ, पुणेकर बोळ, जीवनज्योत हॉस्पिटल परिसर, गुरुवार बाग परिसर, शकुनी गणेश मंदिराची पिछाडी या भागांना गेल्या दोन दिवसांपासून पाणीच येत नाही.
त्यामुळे नागरिकांची पाण्याअभावी परवड होत आहे. गुरुवार बागेच्या लोखंडी प्लेटची तात्पुरती दुरुस्ती करण्यात येऊन संबंधित भागांमध्ये सात टॅंकरने पाणीपुरवठा करणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता शहाजी वाठारे यांनी दिली. ते म्हणाले, येथील व्हॉल्ह कायमस्वरूपी नवीन टाकून पाण्याचे नियंत्रण आणि वितरण नियंत्रित केले जाणार आहे.
संबंधित प्लेट पाण्याच्या दबावामुळे अडकल्याने व्हॉल्व्ह तुटला आणि लाखो लिटर पाणी वाया गेले. या व्हॉल्व्हचे साहित्य एमआयडीसीत मिळत नसल्यामुळे ती नव्याने बनवून आणावी लागणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी मिळणार का याविषयी शंका निर्माण होत आहे .
सातारा शहरामध्ये पाणी वितरण करणारे 40 हून अधिक व्हॉल्व्ह आहेत त्यामुळे या व्हॉल्व्हची दुरुस्ती आणि निगा व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी आहेत. परिणामी व्हॉल्व्हने एअर पकडणे किंवा त्याला गंज येणे अशा तांत्रिक समस्यांमुळे पाणीपुरवठा प्रभावित होत असून नागरिकांना घरात पाणी मिळत नाही.
परिणामी दैनंदिन कामांचा खोळंबा होत आहे. पाणीपुरवठा विभागाकडे तंत्र कुशल कर्मचारी आणि व्हॉल्व्हची माहिती असणारे जाणकार नळकरी नसल्यामुळे या सर्व अडचणी उद्भवत असल्याचे सांगण्यात आले