Amit Shah – गृहमंत्री अमित शहा यांनी आज जम्मू काश्मीरशी संबंधित दोन विधेयके लोकसभेत मांडताना केलेल्या विधानांमुळे प्रचंड गदारोळ निर्माण झाला.
तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या चुकांमुळे जम्मू काश्मीरला भोगावे लागले अशा आशयाची टिप्पणी केल्यामुळे हा गदारोळ झाला. त्याचा निषेध करत विरोधी पक्षसदस्यांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला.
शहा म्हणाले नेहरू यांच्या काळात दोन मोठ्या चुका झाल्या. त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे या चुका झाल्या व इतकी वर्षे जम्मू काश्मीरला त्याचा त्रास सहन करावा लागला. एक म्हणजे जेंव्हा आपले सैन्य जिंकत होते तेंव्हा पंजाबचा भाग येताच युध्दबंदीची घोषणा केली गेली आणि पाकव्याप्त काश्मीरचा जन्म झाला.
तीन दिवसांनी युध्द बंदीची घोषणा केली गेली असती तर आज पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग राहीला असता. पूर्ण काश्मीर न जिंकताच सीझफायर केले गेले आणि दुसरी चूक म्हणजे काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांत नेला गेला.