पुणे – वाघोली येथे शालेय बसच्या झालेल्या अपघातामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही बाब लक्षात घेऊन शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कूल बस चालकांसाठी स्वतंत्र परवाना देऊन त्यांना योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन तसेच बसेसची नियमित तपासणी करण्यासाठी नवीन स्कूल बस नियमावली तयार करण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
शहरी भागासह गेल्या काही वर्षात ग्रामिण भागातही शालेय वाहनांची संख्या वाढलेली आहे. या बसेससाठी नियामवली असली तरी त्याची अंमलबजावणी होत नाही, परिणामी, असे अपघात होऊन त्याचे गंभीर घटनेत परिवर्तन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन शासनाने तातडीनं निर्णय घेण्याची मागणीही निम्हण यांंनी केली आहे.