आदित्य ठाकरे यांचा पहिल्या सभेत भाजपवर हल्लाबोल
लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी पहिली सभा घेतली. त्या सभेच्या माध्यमातून यूपीच्या रणांगणात उतरलेल्या शिवसेनेच्या युवराजांनी भाजपवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला.
आदित्य यांची डुमरियागंजमध्ये सभा झाली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, जनतेच्या कल्याणासाठी राजकारण अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. त्याचेच प्रतिबिंब शिवसेनेच्या वाटचालीत उमटताना दिसते. त्याउलट, धर्माच्या नावाखाली भाजप विविध समाजांमध्ये द्वेष पसरवतो. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना तो पक्ष नक्षलवादी, दहशतवादी म्हणतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारने अनेक चुका केल्या. शिवसेना काही काळ त्या सरकारचा भाग राहिल्याचा आम्हाला पश्चात्ताप आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशात द्वेषभावना आणखीच वाढीस लागली. आता उत्तर प्रदेशात सत्ता परिवर्तन गरजेचे आहे. निवडणुकीनंतर योगी माजी मुख्यमंत्री बनतील, असे त्यांनी म्हटले.
उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या 403 पैकी 60 जागा लढवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. तेवढे उमेदवारही पक्षाने रिंगणात उतरवले. मात्र, शिवसेनेच्या 19 उमेदवारांचे अर्ज विविध कारणांनी फेटाळण्यात आले. त्यामुळे त्या राज्यातील निवडणुकीत आता शिवसेनेचे 41 उमेदवार नशीब आजमावत आहेत.