बहाराईच (उत्तर प्रदेश) – समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात दंगलींना प्रोत्साहन दिले, असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या प्रचारासाठी बाराबंकी येथे झालेल्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते.
उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आल्यावर मुलींना स्कूटी आणि शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याच्या आश्वासनाचा त्यांनी पुनरुच्चार केला. याशिवाय उत्तर प्रदेशात एकस्प्रेस हाय वे आणि कॉलेजचीही उभारणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
बाराबंकीमधील रामनगरमध्ये विनाखंडित होणाऱ्या विजेच्या पुरवठ्यासाठी 63 कोटी रुपयांचे वीज उपकेंद्र उभारण्यात आले आहे. समाजवादी पार्टीच्या परिवारवादी सरकारने आपल्या कार्यकाळामध्ये भेदाचे राजकारण केले होते. मात्र, भाजपच्या सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये समान न्यायाने वीजपुरवठ्याचे धोरण अवलंबले आहे, असेही आदित्यनाथ यांनी सांगितले.
पुरांचा धोका लक्षात घेऊन भाजप सरकारने पूल आणि रस्त्यांचे नियोजनही केले आहे. मात्र, पूर्वीच्या सरकारने नागरिकांच्या समस्यांकडे पूर्ण डोळेझाक केली होती, असे आदित्यनाथ म्हणाले. उत्तर प्रदेशच्या सरकारने माफियांकडून पैसे काढून घेतले आणि तो निधी राज्यातील कल्याणकारी योजनांसाठी वापरला जात आहे, असेही आदित्यनाथ यांनी सांगितले.