फिरोजाबाद – उत्तर प्रदेश निवडणुकीतील पहिल्या दोन टप्प्यांतच आमच्या आघाडीने शतक ठोकले आहे. पुढील दोन टप्प्यांत सरकार स्थापनेसाठी आवश्यक संख्येपर्यंत आम्ही मजल मारू, असा दावा समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी गुरुवारी केला.
उत्तर प्रदेशात विधानसभेच्या एकूण 403 जागा आहेत. त्या राज्यात एकूण सात टप्प्यांत मतदान होईल. पहिल्या दोन टप्प्यांत 113 जागांसाठी याआधीच मतदान झाले. आता पुढील दोन टप्प्यांत प्रत्येकी 59 जागांसाठी 20 आणि 23 फेब्रुवारीला मतदान होईल. त्याचा संदर्भ देऊन अखिलेश यांनी येथील सभेत बोलताना आघाडीच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला.
आताची निवडणूक लोकशाही आणि राज्यघटनेचा बचाव करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. दलित, अल्पसंख्याकांचा आदर राखण्याच्या उद्देशातूनही निवडणुकीला महत्त्व आहे. भाजप जनतेचा विश्वासघात करत आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आणि तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन त्या पक्षाने पाळलेले नाही, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले. उत्तर प्रदेशात सपने राष्ट्रीय लोक दलाशी आघाडी केली आहे. त्या आघाडीने सत्तारूढ भाजपपुढे मोठे आव्हान उभे केल्याचे सध्याचे चित्र आहे.