नागपूर – उत्तरप्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने नागपुरात तीन जणांना धर्मांतर विरोधी कायद्याखाली अटक केली आहे. प्रसाद रामेश्वर कवळे, कौसर आलम शौकत अलि खान आणि भुप्रिया बंडो देवीदास मानकर अशी अटक केलेल्या तीन जणांची नावे आहेत.
हे तीन जण हंसपुरी भागात राहात होते. उत्तरप्रदेश पोलिसांच्या एटीएसने गेल्या महिन्यात धर्मांतरच्या प्रकरणात काही जणांना अटक केली. त्यावेळी हे एक देशव्यापी रॅकेट असल्याची माहिती त्यांना मिळाली.
त्यानुसार त्यांनी देशाच्या विविध भागात जाऊन ही धरपकड सुरू केली आहे. उत्तरप्रदेश सरकारने गेल्या वर्षी बेकायदेशीर धर्मांतरच्या विरोधात एक अध्यादेश जारी केला आहे. धर्मांतर करून केले गेलेले विवाह या कायद्यान्वये रद्दही करण्याची तरतूद यात आहे. या प्रकरणातील आरोपींना दहा वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला जातो.
या प्रकरणात उत्तरप्रदेश पोलिसांनी ज्यांना अटक केली आहे, त्यांच्याकडे एक रजिस्टर सापडले असून त्यात महाराष्ट्र, केरळ, आंध्रप्रदेश, हरियाना आणि दिल्लीतील सुमारे एक हजार लोकांची नावे आहेत.