नवी दिल्ली – आतापर्यंत देशाच्या परराष्ट्र धोरणावरच देशाचे सुरक्षा धोरण अवलंबून असायचे, पण पंतप्रधान मोदी यांनी देशात पहिल्यादांच स्वतंत्र सुरक्षा धोरण निश्चित केले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. आज येथे रूस्तमजी स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी सीमा सुरक्षा दलाचे जवान आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी अमित शहांच्या हस्ते सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना शौर्यपदके प्रदान केली.
यावेळी बोलताना शहा म्हणाले की, मला बऱ्याच वेळा असा प्रश्न पडायचा की, देशाला स्वतंत्र सुरक्षा धोरण आहे की नाही. मोदी पंतप्रधान होईपर्यंत देशाला स्वतंत्र सुरक्षा धोरणच नव्हते. सुरक्षा विषयक ज्या काही बाबी निश्चित व्हायच्या त्या बहुतांशी आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणावरच अवलंबून असायच्या.
ते म्हणाले की, सर्वच देशांशी सलोख्याचे संबंध असावेत अशी आमची कल्पना आहे. पण जर कोणी आमच्या स्वायत्ततेला आव्हान देत असेल किंवा आपल्या सीमाभागात अशांतता माजवत असेल तर त्या बाबतीत त्यांच्याच भाषेत त्यांनी प्रत्युत्तर देण्याचे धोरण मोदी सरकारने स्वीकारले आहे. मोदी सरकारच्या या सुरक्षा धोरणाचा देशाला मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे असेही त्यांनी नमूद केले.सन 2022 पर्यंत देशाच्या सर्व सीमावर्ती भागात कुंपण घातलेले असेल, असेही त्यांनी नमूद केले. सध्या तीन टक्के सीमेवर कुंपण घालायचे काम बाकी आहे.