नवी दिल्ली – दिल्लीमध्ये राजघाटा जवळ गांधी दर्शन येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज महात्मा गांधी यांच्या दहा फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले.
“गांधीजी हे सशक्त, समृद्ध आणि स्वच्छ भारताची कल्पना मांडणारे महान स्वातंत्र्यसेनानी होते. महात्मा गांधी यांनी कायमच प्रत्येक भारतीयाच्या हृदयात स्थान मिळवले होते, तसेच मार्टिन ल्युथर किंग जूनियर आणि नेल्सन मंडेला यांच्यासारख्या महान नेत्यांनी त्यांच्या देशातल्या जनतेच्या उन्नतीसाठी गांधीजी यांच्या कल्पना आणि दृष्टिकोनातून प्रेरणा घेतली होती असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
देशभक्ती आणि वचनबद्धतेच्या माध्यमातून उपेक्षित घटकांच्या उत्थानासाठी कार्य केलेल्या महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्यासारखे महान नेते आपल्या सरकारसाठी दीपस्तंभाची भूमिका बजावत आहेत.
शांतता, सामाजिक सलोखा, एकता आणि विकासाधारित बदल घडवणे ही आपली विचारसरणी आहे. गांधीजी हे केवळ स्वातंत्र्य सेनानी नव्हते तर एक अर्थतज्ञ होते ज्यांनी जग हे प्रत्येकाच्या गरजेसाठी पुरेसे पण प्रत्येकाची लालसा शमवण्यासाठी अपूरे असल्याचे मानले असे सिंह यांनी सांगितले.