पुसेगाव (प्रतिनिधी) – आज शनिवारी दुपारी चारच्या सुमारास मेघगर्जना, विजांचा कडकडाट ,गारांचा राहून राहून होत असलेला जबरदस्त मारा व सोसाट्याच्या वाऱ्यासह अचानक झालेल्या अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका वेटणे, रणसिंगवाडी, उंबरमळे कटगुण, सह पुसेगाव परिसराला सोसावा लागला आहे. शिवारातील ओढ्याना पूर आला तर शेतातील ताली फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर बुध , राजापूर गावात सुसाट वाऱ्यासह पाऊस पडला.
सध्या रब्बीची सुगी अंतिम टप्प्यात आली आहे. , ज्वारी, गहू,हरभरा कांदा या पिकांची काढणीत शेतकरी वर्ग मग्न आहे. मात्र पुसेगाव,वेटणे,रणसिंगवाडी, कटगुण परिसरातील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाने आज सायंकाळच्या सुमारास अचानक हजेरी लावली. गहू, मका, ज्वारी, हरभरा ,कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच मोहराने बहरलेल्या आंब्याच्या फळबागांनाही फटका बसला आहे.
जोराचा गारांचा मारा,धागा विजांच्या कडकडाटासह झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे चांगले उत्पन्न हाती येण्याचे स्वप्न भुईसपाट झाले.दरम्यान अचानक सुरू झालेल्या पावसाने कांदाची ऐरणीत पाणी शिरले तर उपटून पडलेल्या ज्वारीचा कडबा भिजून चिंब झाला आहे.
गहू,हरभरा सारखे काढलेली पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कुटुंबातील सदस्यांना हाताशी धरून लगबग सुरू होती.याच हंगामात शेतकरी वर्ग आपल्या कुटुंबाला पुरेसं एवढं ज्वारी गहू हरभरा हे धान्य घरात साठवून ठेवतो आणि उरलेलं विकून चार पैसे त्यांना मिळत असतात मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुसेगाव ,वेटणे रणसिंगवाडी परिसरात अवकाळी पावसात मोठ्या प्रमाणात गारा पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.तर वीटभट्टी वर थापलेल्या विटा तसेच तयार झालेल्या विटा पावसाने खराब होऊन लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा ,खराब हवामानाचा व रोगराईचा फटका बसत असून पिकांची जोपासना करताना शेतकऱ्यांना मोठा खर्च सहन करावा लागतो.त्यामुळे नुकसानग्रस्त पिकाची कृषी विभागातर्फे पाहणी ,नुकसानीचा पंचनामा करून तातडीने नुकसानभरपाई मिळावी , अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.