पुणे – भाजपचे नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे 29 मार्च रोजी निधन झाले. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर वैकुंठभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बापट यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोक व्यक्त करण्यात आला. मात्र, गिरीश बापट यांचे निधन होऊन अवघे तीन दिवस झाले असतानाच पुण्यात भावी खासदाराचे बॅनर झळकले होते. यावरून आता शहरातील राजकाणार चांगलेच तापल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, पुण्यात पोटनिवडणुकीच्या चर्चा सुरु असताना सर्व पक्ष कामालादेखील लागले असल्याचं दिसून येत आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. अश्यातच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोटनिवडणुकीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. “पुण्याची लोकसभेची जागा कॉंग्रेसच जिंकणार’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी त्यांना धंगेकरांना उमेदवारी देणार का? असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी योग्य उमेदवाराला उमेदवारी देऊ असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे काहीही झालं तरी ही लोकसभेची जागा कॉंग्रेसची आहे आणि जर निवडणूक झाली तर कॉंग्रेसचा मोठ्या मताधिक्यानं विजय होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.