शिरवळ -शिरवळ येथील क्रांतीसिंह नाना पाटील पशूवैद्यकीय महाविद्यालयातील क्वारंटाइन सेंटरमध्ये दुरवस्था आहे. स्वच्छतागृह अस्वच्छ आहे. येथील रूग्णांना दिला जाणारा जेवणाचा दर्जा योग्य नाही, लहान मुलांना दूध दिले जात नाही. या बाबी अतिशय गंभीर असून करोनाबाधित रूग्णांना दररोज गरम पाणी, रूचकर जेवण व स्वच्छतागृहाची चांगली स्वच्छता राखून तातडीने सुधारणा करावी, असे निर्देश विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे यांना दिले.
शिरवळ येथील क्रांतीसिंह नाना पाटील पशूवैद्यकीय महाविद्यालयातील क्वारंटाइन सेंटरला दरेकर यांनी भेट दिली. त्यानंतर ते बोलत होते. तहसीलदार दशरथ काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील, भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस अनुप सुर्यवंशी, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष निखील झगडे, भाजप तालुकाध्यक्ष राहुल हाडके, युनियन लिडर राजेंद्र मगर, उमाकांत राठी, नीळकंठ भुतकर, इम्रान काझी, ग्रामपंचायत सदस्य महेश जाधव, अजिंक्य कांबळे, खंडाळ्याचे नगराध्यक्ष प्रल्हादराव खंडागळे, गटनेते अनिरूद्ध गाढवे, हर्षवर्धन शेळके आदी प्रमुख उपस्थित होते.
श्री. दरेकर म्हणाले, “”खंडाळा तालुक्यातील कोणत्याही कंपनीचे व्यवस्थापन कामगारांना बळजबरीने कामावर बोलवित असेल तर अशा कंपन्यांची यादी द्यावी. या संदर्भात त्वरीत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलले जाईल.’ शिरवळ येथील करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ लक्षात घेऊन श्री. सुर्यवंशी यांनी श्री. दरेकर यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, रूग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते, गरम पाणी नाही, स्वच्छतागृह, स्नानगृहात स्वच्छता नाही, डॉक्टर वेळेवर तपासणी करीत नाहीत. लहान मुले व वृद्धांकडे दुर्लक्ष होते. पुणे जिल्ह्यातून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे शिरवळमध्ये करोनाचा फैलाव झाला असून त्यास सर्वस्वी येथील पोलीस निरीक्षकच जबाबदार आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.
खंडाळा तालुक्यातील कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना कामावर न बोलविता त्यांना भरपगारी सुट्टी द्यावी, असे अनिरूध्द गाढवे यांनी सांगितले. शिरवळ येथील नागरिकांचे थर्मल स्कॅनिंग करण्याचे नियोजन केले असून त्यात एनजीओ, स्वंयसेवक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची टीम, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे, अशी माहिती राजेंद्र मगर यांनी दिली.