मुंबई : अकोला जिल्ह्यातील पारस गावात मंदिरावर झाड कोसळून 7 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 20 ते 25 जण जखमी झाले असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बाबूजी महाराज मंदिरात ही दुर्घटना घडली आहे. रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता त्याच वेळी मंदिरात 50 ते 60 भाविक होते.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालूक्यातल्या पारस गावातील बाबूजी महाराज मंदिरात रविवारी लगतच्या जिल्ह्यांसह राज्यातून भाविकांची मोठी गर्दी असते. रविवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मंदिरात आरती झाली. आरतीनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे बाहेर असलेल्या भाविकांनी मंदिरात असलेल्या शेडचा आधार घेतला आणि नेमकं याच वेळी घात झाला. वाऱ्यामुळे मंदिरासमोर असलेलं लिंबाचं झाड शेडवर कोसळले.
दुर्घटनेबाबत माहिती मिळताच प्रशासनाचं पथक बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. यासोबतच ढिगारा हटवण्यासाठी जेसीबी आणि जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, जोरदार वारा आणि पाऊस बचाव कार्यात अडथळा ठरत आहे. घटनास्थळी नागरिकांचीही मोठी गर्दी झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 50 ते 60 जण मंदिराच्या शेडखाली होते. ज्यावेळी सोसाट्याचा वारा सुटला, त्यावेळी काही लोकं मंदिराच्या आतमध्ये गेले, तर 15 ते 20 जण मंदिराच्या शेडमध्ये होते. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे लिंबाचे झाड शेडवर कोसळले. शेडखाली उभी असलेली लोक शेडखाली अडकले. आतापर्यंत 7 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. अद्याप बचाव कार्य सुरूच आहे. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.