मुंबई – “मुख्यमंत्री डॉ.मिंधे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संपूर्ण सरकारसह रविवारी अयोध्येत दाखल झाले. मिंधे गटाचे अनेक मंत्री व आमदार या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. मिंधे व त्यांच्या गटाबरोबर भाजपचे मंत्रीसुद्धा आहेत व पाठोपाठ उपमुख्यमंत्री फडणवीसदेखील तेथे पोहोचले. गेल्या अनेक वर्षांत महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांना व मंत्र्यांना अयोध्या किंवा प्रभू श्रीरामांची आठवण आली नाही” असा टोला सामनातून सत्ताधाऱ्यांवर लगावण्यात आला आहे.
“गेल्या पाचेक वर्षांत आम्ही अयोध्येत हजारो शिवसैनिकांसह तीन-चार वेळा जाऊन आलो. शरयूतीरी आरती, दर्शन, अयोध्येतील साधुसंतांचे संमेलन असे अनेक धार्मिक सोहळे पार पडले व सोबत आजचे मिंधे व त्यांची टोळीसुद्धा होती. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर अयोध्या नगरीचे विशेष प्रेम आहे. श्रीरामांच्या सुटकेसाठी व अस्मितेसाठी जो लढा झाला, त्यात शिवसेनाप्रमुखांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे शिवसेनेचे अयोध्येशी एक भावनिक नाते आहे. ते नक्कीच राहील. आता जे लोक अयोध्येत जाऊन नकली शिवसेनेचा जयजयकार करत आहेत ते ढोंग व खोक्यांतून निर्माण झालेला अहंकार आहे.अयोध्येतील रामदरबारी पाप आणि अहंकारास थारा नाही, हे त्यांना भविष्यात कळून येईल. ” असा सूचक इशारा सामनातून वर्तवण्यात आला आहे.
“राम हे आपल्या जीवनाचा भाग आहेत व तो कुणालाच दूर करता येणार नाही, पण जे मनाने श्रीरामांचे नाहीत ते बिनकामाचे अयोध्येत जाऊन काय करणार? श्रीरामांच्या दरबारात सत्य व इमान यांचाच बोलबाला असतो, पण रामनाम भ्रष्ट करून स्वतःची राजकीय भाकरी शेकण्याचा जो प्रयत्न सध्या महाराष्ट्र आणि देशात सुरू आहे, ते रामनामास लांच्छन आहे. डॉ. मिंधे व त्यांचे चाळीस लोक हे आधी सुरत व नंतर रेडय़ांची पूजाविधी करण्यासाठी गुवाहाटीस गेले. सत्ता स्थापन झाल्यावरही ते लोक अघोरी रेडा विधीसाठी पुन्हा गुवाहाटीस गेले, पण गुवाहाटीऐवजी श्रीरामांच्या अयोध्येत जावे असे या ‘भक्तां’ना वाटले नाही, हे आश्चर्यच आहे. श्रीरामांपासून सत्य दडवता येणार नाही व राम असत्याला आशीर्वाद देणार नाहीत याची खात्री असल्यानेच हे लोक अयोध्येऐवजी गुवाहाटीस गेले. आता मिंधे सरकारातील काही मंत्री आणि आमदार अयोध्येत गेले, पण बरेच आमदार अयोध्या यात्रेत सामील झाले नाहीत, ते महाराष्ट्रातच राहिले. श्रीरामांच्या दर्शनास जाऊ नये असे त्यांना का वाटले, हे रहस्य आहे. मिंधे गटात सरळ दोन गट पडले आहेत व उद्याच्या बेदिलीची ठिणगी अयोध्येच्या भूमीवर पडली आहे. त्यामुळे अयोध्येत उत्सव आहे की राजकीय निरोप समारंभ हे येणारा काळच ठरवेल.” अशी टीका देखील सामनातून करण्यात आली आहे.
“उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी म्हणे यात्रेची चोख व्यवस्था केली. बेइमानांसाठी पायघडय़ा घालणे ही तर भाजपची संस्कृतीच आहे व त्याबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. वास्तविक इकडे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, गारपिटीने थैमान घातले आहे व शेतकरी हवालदिल झाला आहे आणि तिकडे संपूर्ण सरकार अयोध्येत उत्सवात अडकून पडले. हे काही रामराज्याचे चित्र नाही. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात बळीराजावर अवकाळीचा कहर झाला आहे. गहू अक्षरशः जमिनीवर आडवा झाला. सांगलीत द्राक्ष, संत्रा, हरभरा, कलिंगड असे सगळे पीक नष्ट झाले. मिरची, कांदा, आंबा, भाजीपाला नष्ट झाला. बुलढाण्यात कांद्याचे अतोनात नुकसान झाले. अनेक भागांत घरादारांचे नुकसान झाले. या नुकसानीवर उपाय शोधण्याऐवजी सरकार महाराष्ट्रातून गायब झाले व अयोध्येत यात्रा-उत्सवांत अडकून पडले. श्रीरामांच्या कार्यपद्धतीशी हे सुसंगत नाही. श्रीराम हे दयाळू, प्रजादक्ष राजे होते. ते प्रजेचे पालनहार होते. आज जे अयोध्येत जाऊन रामनामाचा जप करीत आहेत, त्यांच्या तोंडात राम, पण बगलेत खंजीर आहे. श्रीरामांच्या दर्शनाने त्यांचे पाप धुतले जाईल की नाही ते माहीत नाही, पण त्यांना सुबुद्धी मिळो व महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर होणारे रावणी हल्ले परतवून लावण्याचे बळ मिळो ! अर्थात गुडघे टेकणाऱ्या मिंध्यांकडून ही अपेक्षा करणे चूकच आहे. चोरलेल्या धनुष्याने शौर्य गाजवता येत नाही !” असं स्पष्ट मत सामनातून व्यक्त करण्यात आलं आहे.