कराड – बाजार समिती निवडणुकीत हमाल, मापाडी, ग्रामपंचायत व सर्व सेवा सोसायट्यांच्या सदस्यांना मतदानाचा हक्क मिळणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांनाही मतदानाचा हक्क मिळावा, अशी मागणी आहे. त्यावर न्यायालयाचा निर्णय येईलच. परंतु, त्यांना मतदानाचा हक्क मिळाल्यास निवडणुकीची व्यापकता वाढणार असून त्याचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे. त्यामुळे सरकारला ते न परवडणारे असल्याचे मत आ. बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी 16 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. पाटील म्हणाले, सध्या बाजार समिती निवडणुकांच्या मतदार याद्या बनवण्याचे काम सुरू आहे. परंतु, हायकोर्टाच्या आदेशानुसार जुन्या याद्यांच्या अनुषंगानेच निवडणुका होतील. मात्र, सर्व निवडणुका झाल्याशिवाय या निवडणुका होण्याची शक्यता कमी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, शासकीय विश्रामगृहात त्यांनी येणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमिवर कराड येथील प्रसिद्ध दैत्यनिवारणी मंदिर व मंदिर परिसराचा स्थानिक प्रशासनाकडून आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. रणजीत पाटील, तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी सौ. मीना साळुंखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कराड नगरपालिका मुख्य अभियंता मूरलीधर धायगूडे आदींची उपस्थिती होती.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, करोनाचा संसर्ग कमी आल्याने यावर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा झाला. त्यानुसार येणारा शारदीय नवरात्रोत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. येथील दैत्यनिवरणी मंदिर प्रसिद्ध व जागृत देवस्थान असून नवरात्रोत्सवात येथे भाविक-भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते.
त्यासाठी शाहू चौक ते श्री दैत्यनिवारणी मंदिर रस्ता व अजंठा ट्रान्स्पोर्ट रोड ते श्री दैत्यनिवारणी मंदिर रस्त्यावर लाईटची व्यवस्था करणे, रस्त्यावरील खड्डे मुजवणे, मंदिर परिसरात पावसामुळे फरशी/पेव्हर ब्लॉक घसरडे असल्यास वा माती, गाळ आला असल्यास त्याची स्वच्छता करणे, शाहू चौक ते श्री दैत्यनिवारणी मंदिर रस्ता व अजंठा ट्रान्स्पोर्ट रोड ते श्री दैत्यनिवारणी मंदिर रस्त्याच्या दोन्ही बाजूची गटारे स्वच्छ करणे व वाढलेली गवत, झुडपे काढून स्वच्छता करणे, स्वच्छ स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था याबाबतच्या सूचना त्यांनी प्रशासनास दिल्या.
त्याचबरोबर जुन्या कोयना पुलावरील बोर्ड व्यवस्थित लावणे व स्वच्छता करणे, मिक्सर मशिन (टॅक्टर) बाजूला लावण्याची व्यवस्था करणे, नवरात्र काळात डास, मच्छर आदींच्या बंदोबस्तासाठी पावडर, किटकनाशकाची फवारणी करणे, यशवंतराव चव्हाण सभागृह परिसराची स्वच्छता करणे, महिलांच्या दर्शन रांगेची व्यवस्था करणे, सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदोबस्ताची व्यवस्था करणे, पादत्राणे स्टॅन्ड व वाहनाच्या पार्कींगची व्यवस्था करणे, हार, नारळ, ओटी साहित्य आदी. विक्रेत्यांची बैठक व्यवस्था करणे आदींबाबतचा आढवा घेऊन सदर सुविधा तातडीने उपलब्ध करण्याबाबतच्या सूचना आ. पाटील यांनी केल्या.
74 सालात पहिली दुर्घटना
शहरात आदर्शवत भुयारी गटर योजना राबवून 74 वर्ष झाली. परंतु, एवढ्या वर्षात परवा पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याचा गटरमध्ये पडून व गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पहिल्यांदाच घडली. नगरपालिकेने कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने सर्व साहित्य पुरवले असून प्रत्येक कर्मचाऱ्यांनीही काम करताना काळजी घेतली पाहिजे, असेही आ. पाटील यांनी यावेळी सांगितले.