Uk Disagrees With India : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव वाढला आहे. त्यातच भारताने कॅनडाच्या ४१ अधिकाऱ्यांना २० ऑक्टोबपर्यंत भारत सोडायला सांगितले. यानंतर कॅनडाने त्यांच्या ४१ अधिकाऱ्यांना मायदेशी परत बोलावले. या पार्श्वभूमीवर आता इंग्लंडकडून भारताच्या या निर्णयावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे.
इंग्लंडच्या परराष्ट्र खात्याकडून या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. इंग्लंडचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते म्हणाले, “मतभेद संपवण्यासाठी चर्चा होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी परराष्ट्र विभागाचे अधिकारी आपआपल्या ठिकाणी उपस्थित असावे लागतात. आम्ही भारताने घेतलेल्या निर्णयाशी सहमत नाही. भारताच्या निर्णयामुळे कॅनडाच्या ४१ परराष्ट्र अधिकाऱ्यांना भारत सोडून जावं लागलं आहे.”
भारताने १९६२ च्या ‘व्हिएन्ना कन्व्हेन्शन’चं पालन करावं, असेही इग्लंडने नमूद केले. परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यांचे विशेषाधिकार काढून घेण्याच्या मुद्द्यावर इग्लंड म्हणाले, “सर्व देशांनी १९६२ च्या ‘व्हिएन्ना कन्व्हेन्शन’चं पालन करावं. परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यांचे विशेषाधिकार आणि सुरक्षा काढून टाकणं १९६२ च्या ‘व्हिएन्ना कन्व्हेन्शन’च्या तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीला धरून नाही.” असे देखील इंग्लंडकडून म्हणण्यात आले आहे.
त्यासोबतच “भारताने हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी स्वतंत्र तपासात कॅनडाबरोबर सहकार्य करावं. तसेच भारताने कॅनडाच्या परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यांना देश सोडून जाण्यास सांगू नये,” असेही इग्लंडच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे.