मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषदेत हजेरी लावली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरुन शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. राज्यात सीमाप्रश्नावर चर्चा सुरु असताना, मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जाण्याची गरज काय होती, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सभागृहात उपस्थित केला. याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी सभागृहात पेन ड्राइव्ह सादर केला.
मुख्यमंत्र्याच्या दिल्ली दौऱ्यावर बोलताना, ‘आता दिल्लीत गेलाच आहात तर मग तिथे सीमाप्रश्न उपस्थित करणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सभागृहात पेन ड्राईव्ह आणल्याची माहिती दिली. या पेन ड्राईव्हमध्ये सीमाभागावरील एक डॉक्युमेंटरी असल्याचे ठाकरे म्हणाले.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी आज सभागृहातील कामकाजाला उपस्थिती लावली. सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. दरम्यान, आपल्या निवेदनादरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सभागृहात पेनड्राईव्ह आणल्याचे सांगितले.
उद्धव ठाकरे म्हणाले, “विरोधीपक्षाने सीमावादाबाबत प्रस्ताव मांडला आहे. सभागृहातील सर्वांचे या विषयाबाबत एकमत आहे. जवळपास 56 वर्षापासून हा लढा सुरु आहे. ज्यावेळी भाषावार प्रांत रचना झाली त्या आधीपासून सीमाभागात मराठी भाषा रुजलेली आहे. कित्येक वर्ष तिथे राहणारे नागरिक मराठी भाषा बोलतात. हा लढा राजकीय नाही. एक पेन ड्राईव्ह मी देणार आहे. 1970च्या दशकात एक फिल्म सीमा भागातील नागरिकांवर केलेली आहे. अठराव्या शतकात त्याठिकाणी मराठी कशी वापरली जात होती. त्याचा उल्लेख आहे. ही फिल्म दोन्ही सभागृहातील सदस्यांना दाखवा”.
हा भाषावार प्रांत रचनेचा विषय नाही. माणुसकीचा हा विषय आहे. इथ खालच्या सभागृहात काहीजण म्हणतात आम्ही लाट्या काठ्या खाल्ल्या आहेत. त्यावेळी तुम्ही सत्ताधारी पक्षात होतात, आता तुम्ही सीमा ओलांडली आहे. मुख्यमंत्री दिल्लीत गेले. खरंतर हा विषय सुरु असताना दिल्लीला जाणे योग्य आहे का? मुळात गृहमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर यांनी केलं काय? इथे आम्ही कायदा केला की महाराष्ट्रात मराठी पाट्या लागल्या पाहिजेत तर काही जण कोर्टात गेले. मुळात आपलं सरकारं कर्नाटक सरकारसारखी भूमिका मांडणार आहे का? असे काही प्रश्न यावेळी उद्धव ठाकरे यांनी सभागृहात उपस्थित केले.