सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे रणशिंग भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी फुंकले. आपण एकत्र जवाबदारीने काम करून ही लढाई नक्की जिंकू. विधानसभेच्या लढाईसाठीही सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन उदयनराजे यांनी केले. येथील दैवज्ञ मंगल कार्यालयात भाजपचे तालुकाप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व पदाधिकाऱ्यांचा मेळावा गुरुवारी झाला.
मेळाव्यास भाजपचे कराड दक्षिणचे नेते आणि विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, सातारच्या नगराध्यक्ष सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, दत्ताजी थोरात, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कविता कचरे, सुवर्णा पाटील, सातारा पालिकेतील भाजपच्या गटनेत्या सिद्धी पवार, नगरसेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे, आशा पंडित, प्राची शहाणे, मिलिंद काकडे, विठ्ठल बलशेटवार, सुनील काटकर, ऍड. दत्तात्रय बनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
उदयनराजे म्हणाले, लोकसभा पोटनिवडणुकीत मला तुमचे सहकार्य हवे आहे. मी नकळतपणे कुणाला दुखावले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. मी छत्रपती घराण्यात जन्मलो, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज, हे दोनच खरे छत्रपती आहेत. समाजकारणाची ही लढाई खऱ्या अर्थाने तुमचीच आहे. लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणुका जवाबदारीने व एकदिलाने लढू या. उदयनराजे यांच्या पक्षप्रवेशाने जिल्ह्यात भाजपची ताकद प्रचंड वाढली आहे. त्यांच्यासाठी आपण राजकीय ताकद पणाला लावून त्यांना पुन्हा चांगल्या मताधिक्क्याने निवडून आणू या, असे आवाहन अतुल भोसले यांनी केले. भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते कोणत्याही क्षणी निवडणुकीला तयार असतात आणि पक्षवाढीसाठी काम करतात. लोकसभेसह जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन विक्रम पावसकर यांनी केले.