जत – जत तालुक्यातून हादरवणारी घटना समोर आली आहे. टोळी युद्धातून दोघांचा खून करण्यात आला आहे. या घटनेमध्ये अन्य् एक जण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. हा धक्कादायक प्रकार जत तालुक्यातील उमदी येथे घडला आहे. सोशल मीडियावरील वादातून आणि पूर्वैमनस्यातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. या दुहेरी खुनाच्या घटनेने जत तालुका हादरला आहे.
मदगोंडा नागा बगली (वय 24) व संतोष राजू माळी (वय 23) रा.उमदी अशी खून करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. प्रकाश मल्लिकार्जून परगोंड (वय 22) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उमदी पंढरपूर मार्गावर हा थरार घडला असून पोलिसांनी या प्रकरणी संशयित 12 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळी पोलीस अधिक्षक दीक्षित कुमार गेडाम, उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले यांनी भेट दिली आहे. उमदी येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.सोशल मीडियावरील वादातून आणि पूर्वैमनस्यातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून जत येथील एका टोळीचा म्होरक्या, उमदी येथील सहकारी तसेच उमदी येथील एक टोळी यांच्यात सतत संघर्ष सुरू होता. त्याची किनार या घटनेला असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.