रायपूर – आंबा तोडल्याच्या वादातून दोघा अल्पवयीन मुलांची हत्या करण्यात आली. ही घटना छत्तीसगडमधील बालोदाबाजार जिल्ह्यात घडली आहे. शौर्य (वय 11) आणि लवेंद्र (वय 14) अशी हत्या झालेल्या मुलांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. आरोपी चौघेही अल्पवयीन आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 20 मार्च रोजी चाकरवे गावातील उमेंद्र चेलक आणि जनक राम चेलाणे यांनी आपली मुले सकाळपासून गायब असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलांची चौकशी सुरू केली. त्यानंतर 22 मार्च रोजी गावापासून काही अंतरावर असलेल्या शेतातून दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले.
या मुलांची हत्या झाल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपासादरम्यान या दोन मुलांसह इतर मुलेही पाहिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यातील दोन आरोपी मुलांचे शौर्य आणि लवेंद्र यांच्याशी पूर्वी आंबे तोडण्यावरून भांडण झाल्याचेही पोलिसांना समजले. पोलिसांनी आरोपी मुलांची चौकशी केली असता ही बाब उघडकीस आली.
20 मार्च रोजी दोन्ही मुले (शौर्य आणि लवेंद्र) गावाजवळील नदीत आंघोळ करून घरी परतत असताना आरोपी मुलांशी त्यांचा सामना झाला. आरोपी मुलांनी आधी झालेल्या वादातून दोन्ही मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
दोन्ही मुले शेताकडे पळू लागली असता आरोपी मुलांनी पाठलाग करून त्यांना पकडले. नंतर आरोपींनी दोघांनाही काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. बेदम मारहाणीत दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी चारही मुलांना ताब्यात घेतले असून लाठ्याही जप्त केल्या आहेत, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.