सासवड : पुरंदर तालुक्यामध्ये गेल्या आठ दिवसांमध्ये दोन बालविवाह रोखण्यास यश आले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये हे विवाह पार पडत असताना एक विवाह रोखण्यात यश आले तर एका ठिकाणी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पुरंदरच्या संरक्षण अधिकारी कविता चौरे यांनी दिली.
पुरंदर तालुक्यातील पिंपळे येथील एक बालविवाह संपन्न झाला होता या प्रकरणी सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून दिवे (ता. पुरंदर) येथील हा विवाह पोलीस व महिला समुपदेशन केंद्राच्या मदतीने हा विवाह जागीच रोखण्यात यश आले. दिवे येथे चौरे म्हणाल्या की, बालविवाह केल्यामुळे माता व बालमृत्यूत वाढ होत आहे.
कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले. याबरोबरच संबंधित बालिकेची शैक्षणिक प्रगती थांबत तिच्या विकासामध्ये अडचणी निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले. बाल विवाह करणे व संबंधित बाल विवाहात सहभागी होणे बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार गुन्हा आहे. असा बाल बालविवाह झाल्यास या कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद केली असल्याचे त्यांनी नमूद केले.
कोणताही विवाह करीत असताना आधारकार्ड या कागदपत्राच्या आधारे विवाह मंगल कार्यालय मालकांनी परवानगी देऊ नये. विवाहप्रसंगी पालकांनी आधारकार्डच्या जन्म तारखेचा आधार न घेता जन्म तारखेचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शाळेतील जन्माची नोंद या कागदपत्रांचा आधार घेऊन वयाची खात्री करावी.
– कविता चौरे, संरक्षण अधिकारी, पुरंदर तालुका