नगर, (प्रतिनिधी) – जिल्हा बँकेकडून पीककर्जाची वसुली सुरु आहे. परंतु नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून केवळ कर्ज मुद्दल रकमेची वसुली करण्याचे सांगितले आहे. असे असले तरी जिल्हा बँकेकडून व्याजाच्या रकमेची आकारणी करण्यात येत असल्याचा आरोप करत ही व्याजाची वसुली थांबवावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदेश कार्ले यांनी केली. तसे निवेदन त्यांनी उपनिबंधकांना दिले. व बँक अंमल बजावणी करत नाही, असे लक्षात येताच लगेच ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.
यावेळी माजी सभापती रामदास भोर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ, माजी सभापती संदीप गुंड, पंचायत समितीचे माजी सदस्य गुलाब शिंदे भाऊ तापकीर आदी उपस्थित होते.
पीककर्जाची नियमित परतफेड करत असलेल्या शेतकऱ्यांकडून फक्त कर्ज मुद्दल रकमेची वसुली करणेबाबत पत्र मा सहकार आयुक्त यांनी (दि १४) रोजी दिले. बँका त्यास दाद देत नसल्याने पुन्हा सहकार आयुक्त यांनी (दि.२७) रोजी पुन्हा स्मरण पत्र देण्यात आले आहे.
तथापी दुष्काळी परिस्थितीमध्येही जिल्हा बँकेकडून व्याजाच्या रकमेची आकारणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय असून उपरोक्त पत्राची जिल्हा बँकेकडून अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून येते. शेतकर्यांच्या पिककर्जाचे व्याज न घेण्याबबाबत पुन्हा आपल्या स्तरावरून योग्य तो आदेश निर्गमित करावा म्हणून ठिय्या आंदोलन करण्यात आले.
दरम्य़ान तीन तासांनंतर जिल्हा उपनिबंधक यांनी आंदोलक यांना बँकेस सदर आदेशाची अंमलबाजावनी करण्याचे लेखी पत्र आंदोलकांना दिले. अंमल बजावणी न केल्यास कारवाईस सामोरे जावे लागेल असे, आश्वासन ही देण्यात आले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.