सातारा – जिल्ह्यात आणखी बारा करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी बुधवारी दिली. आरोग्य विभागाने काल जाहीर केलेल्या अहवालानुसार करोनाबळींची संख्या पाच होती; परंतु गेल्या 24 तासांत करोनाबळी दुपटीने वाढल्याने जिल्ह्यातील स्थिती अजूनही चिंताजनक असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हे बळी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याबरोबर लोकांमध्ये आणखी जागृती करणे आवश्यक बनले आहे. करोनामुळे जिल्ह्यातील 1580 नागरिक आतापर्यंत मृत्युमुखी पडले आहेत.
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना पिंपरी, ता. कोरेगाव येथील 85 वर्षीय पुरुष, आकाशवाणी केंद्राजवळ, सातारा येथील चार वर्षीय बालिका, धामणेर, ता. कोरेगाव येथील 68 वर्षीय पुरुष, पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय पुरुष, घारेवाडी, ता. कराड येथील 48 वर्षीय पुरुष, वडूज, ता. खटाव येथील 66 वर्षीय पुरुष, सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव येथील 90 वर्षीय पुरुष, निंबवडे, ता. आटपाडी येथील 69 वर्षीय पुरुष, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना लिंबाचीवाडी, ता. सातारा येथील 71 वर्षीय महिला, घारेवाडी, ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष, सुपने, ता. कराड येथील 43 वर्षीय महिला, रेठरे, ता. कराड येथील 80 वर्षीय पुरुष, अशा एकूण 12 बाधितांचा मृत्यू झाला.
424 नागरिक करोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालये, करोना केअर सेंटर, डीसीएचसीमध्ये उपचार घेतलेल्या 424 नागरिकांना घरी सोडण्यात आले. त्याचबरोबर 336 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. सातारा येथील जिल्हा रुग्णालयातील 14, कराड उपजिल्हा रुग्णालयातील 17, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 15, कोरेगावमधील 18, वाईतील 11, खंडाळा येथील 21, रायगावमधील 41, पानमळेवाडीतील 54, मायणीतील 17, महाबळेश्वरमधील दहा, पाटणमधील 13, दहिवडीतील पाच, खावलीतील नऊ, तळमावलेतील 18, म्हसवडमधील 16 व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 57, अशा एकूण 336 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.