दुबई – सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या साखळीतील अखेरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा मैदानात उतरला व आपण पूर्ण तंदुरुस्त झाल्याचे सिद्ध केले. आता तरी त्याचा समावेश ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात करा, अशा शब्दात विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी बीसीसीआयच्या निवड समितीवर ताशेरे ओढले आहेत.
रोहित शर्माच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला विश्रांतीची गरज असल्याचा अहवाल बीसीसीआयच्या फिजीओने दिला होता. त्याच आधारावर त्याची ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात निवड झाली नव्हती. मात्र, आता रोहितने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात सहभागी होत आपण पूर्ण तंदुरुस्त असल्याचे सिद्ध केल्यामुळे आता निवड समिती काय निर्णय घेणार, असा सवालही गावसकर यांनी केला आहे.
रोहितने मैदानात उतरून आपल्याबाबतच्या सर्व शंका दूर केल्या आहेत. आता जर तो तंदुरुस्त असेल तर त्याचा या मालिकेसाठी भारतीय संघात समावेश झालाच पाहिजे. त्याच्या दुखापतीबाबत सातत्याने चर्चा सुरू आहे. त्यातच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली व प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही आपापली मते व्यक्त केली होती. आता त्यांनीच रोहितच्या तंदुरुस्तीबात निवड समितीसमोर प्रश्न उपस्थित करावा, असेही त्यांनी सांगितले.
रोहितबाबत शास्त्री अनभिज्ञ कसे – सेहवाग
रोहित शर्माच्या दुखापतीचे स्वरूप व त्याला संघात स्थान का मिळाले नाही याबाबत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना काहीच माहिती नव्हते, या गोष्टीवर माझा तरी विश्वास बसत नाही, असे स्पष्ट मत वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले आहे. निवड समितीची संघ निवडीची एक प्रक्रिया असते. रोहितसारख्या मोठ्या खेळाडूला जेव्हा संघात स्थान दिले जात नाही तर त्यापूर्वी समिती मुख्य प्रशिक्षकाशी संवाद साधते, संपूर्ण माहिती घेते व त्यानंतरच निर्णय घेते, त्यामुळे याबाबत शास्त्रीच अनभिज्ञ होते हे पटत नाही, असेही सेहवाग म्हणाला.