बावडा – सध्या कडक ऊन्हामुळे अंगाची काहीली होत आहे. अशात जर थंडगार पाणी प्यायला मिळाले तर आत्मा शांत झाल्याची प्रचिती येते. शुद्ध आणि थंड पाण्याच्या पुरवठ्यातून हाताला रोजगार तर मिळतोच वरून नागरिकांची तहान पण भागते. त्यामुळेच इंदापूर तालुक्यातील नीरा, भिमा खोऱ्यांत ग्रामीण भागामध्ये जारचा व्यवसाय जोरात सुरु असलेला दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षांपासून इंदापूर तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. त्यामुळे शेतीलाच काय पण पिण्याच्या पाण्यासाठी देखील नागरिकांना कसरत करावी लागत आहे. महत्वाचे म्हणजे इंदापूर हा नीरा आणि भीमा नद्यांच्या कुशीत वसलेला तालुका आहे.असे असताना देखील पिण्याच्या पाण्यासाठी झगडावे लागत आहे.
ग्रामीण भागातील गावोगावचे ग्रामपंचायत प्रशासन पाण्याच्या प्रश्नाबाबत गंभीर नसल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. जनता मात्र अशा उन्हाच्या तडाक्यात आपले व आपल्या कुटुंबाला अशुद्ध पाणी पाजून आरोग्य धोक्यात घालू शकत नाही. नेमके हेच ओळखून अनेक गावातील तरूण व्यवसायिकांनी आपला मोर्चा शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या व्यवसायाकडे वळवला आहे. जवळपास प्रत्येक गावात किमान एक तरी शुद्ध पाण्याचा व्यवसाय सुरू आहे.
जारच्या व्यवसायातून लोकांना शुद्ध थंडगार दिले जाते. एका जार व्यवसायाकडून दररोज जवळपास दोन ते अडीच हजार लिटर पाणी वितरीत केले जाते.एका जारमध्ये अठरा ते वीस लिटर पाणी बसते. एक जारची किंमत पंचवीस ते तीस रुपये एवढी आकारली जाते. यानुसार एक जार व्यवसायिक दररोज पाच ते सात हजार रुपयांचा व्यवसाय करतो. यातूनच प्रतिमहिना दिड ते दोन लाख रुपये होतात. त्याच्याशिवाय या व्यवसायाच्या माध्यमातून चार ते पाच मजूरांच्या हाताला रोजगार उपलब्ध होतो.
करोनाने सध्या जगभर थैमान घातले आहे. शहराबरोबरच ग्रामिण भागात घराघरात करोना विषाणू पोहचला आहे. त्यामुळे जगभरातील जनसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लॉकडाऊनमुळे सर्वत्र बंद असल्यामुळे जनता करोनाशी लढताना दिसून येत आहे. अशा कठीण काळात करोनाशी लढत अनेकजण मदतीचा हात देत आहेत.
परंतु मार्च महिन्यापासून अनेक भाग्यविधाते, आमदार, खासदार, विविध कार्यक्रमात अग्रेसर असणारे नेते मात्र स्व-संरक्षणात गुंतले असल्याचे दिसून येत आहे.
निवडणुकांच्या काळात विविध प्रकारची आश्वासने देणारे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, गाव नेते, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार, मंत्री आत्ता मात्र कोणीही पुढे येताना दिसत नाहीत.
वर्षभर उत्पन्न मिळऊन देणारा व्यवसाय
उन्हाळा, पावसाळा असो वा हिवाळा वॉटर सप्लायचे अशुद्ध पाणी ही कायमचीच समस्या. कोणताही ऋतू असला तरी आरोग्यासाठी अशुद्ध पाणी ही कायमचीच समस्या झालेली आहे.त्यासाठीच जारचे शुद्ध पाणी प्रत्येक ऋतूत उपयोगी पडते. म्हणून जारचा व्यवसाय हा वर्षभर हमखास उत्पन्न मिळऊन देणारा व्यवसाय आहे.
प्रशासन ठरतंय कुचकामी
खरे तर नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करणे प्रत्येक ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी आहे. परंतु ग्रामपंचायत प्रशासन कुचकामी पडत असल्याने कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात घालण्याची रिस्क कोणीच घ्यायला तयार होत नाहीत. त्यामुळे शुद्ध पाण्याचे जार खरेदी करण्याकडेच ग्रामस्थांचा कल असल्याचेच ग्रामीण भागात दिसून येते.