मुंबई – नागपूर महापालिका आयुक्त पदावर कर्यरत असलेल्या तुकराम मुंढे यांची काल पुन्हा एकदा बदली झाली असून आता त्यांच्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तुकाराम मुंढेंच्या अन्य कारकिर्दींप्रमाणेच नागपुरातील कारकीर्द देखील वादळी ठरल्याने त्यांची ही बदली देखील चर्चेचा विषय ठरली आहे.
तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या बरोबर एक महिना आगोदर म्हणजेच २६ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामानाला एक मॅरेथॉन मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी, “तुकाराम मुंढे नागपुरात महापालिका आयुक्त म्हणून आल्यापासून तिथे शिस्त लागली आहे. मग मी कोणाच्या मागे उभं राहिलं पाहिजे? मी शिस्तीच्या मागे उभा आहे. एखाद्या अधिकाऱ्याच्या कठोरपणाचा तुम्ही लोकांच्या हितासाठी उपयोग करून घेत असाल तर वाईट काय?” असं वक्तव्य करत आपला मुंढेंना पाठिंबा असल्याचं जाहीर केलं होत.
मात्र काल राज्य सरकारतर्फेच मुंढेंच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला. असं असलं तरी मुंढे यांची ही पहिलीच बदली आहे असं नाही. त्यांच्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत १४ बदल्या झाल्या आहेत.
यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीही मुंढेंना बळ देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नवी मुंबईतून पिंपरी चिंचवडला परिवहन विभागात, तिथून नाशिक महापालिकेत, मग मंत्रालयात मुंढेंची बदली करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्याआधीच्या आघाडी सरकारच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या अनेक बदल्या झाल्या होत्या.
अशातच आता, विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मुंढेंच्या बदलीचा निर्णय घेतल्याने त्यांनीही सोयीचं राजकारण करत मुंढेंची बदली केली की तुकाराम मुंढेंची कार्यपध्दतच हेकेखोर, लोकप्रतितिनिधींना न जुमानणारी असल्याने त्यांची बदली झाली? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.