मुंबई – रशिया- युक्रेन युद्धानंतर भारताकडील परकीय चलन साठा कमी होऊन रुपयाचा दर वेगाने घसरत आहे. यामुळे भारताची निर्यात वाढण्यास मदत होईल असा युक्तिवाद अनेकांकडून केला जात आहे. मात्र रुपयाचे वेगाने अवमूल्यन होणे भारतासाठी दीर्घ पल्ल्यात फायदेशीर होणार नाही असे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले आहे.कच्चे तेल आणि इतर काही महत्त्वाच्या बाबीची भारताला आयात करावी लागत आहे. यासाठी परकीय चलन खर्ची पडत आहे. त्या तुलनेत भारताची निर्यात कमी असल्यामुळे रुपयाच्या मूल्यावर परिणाम होत आहे.
यासाठी भारताला विविध क्षेत्रातून निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे आयातीसाठी डॉलर खर्च होण्याबरोबरच निर्यातीमुळे डॉलरची आवक वाढण्यास मदत होईल असे गोयल म्हणाले. अवमूल्यनामुळे निर्यात वाढण्यास चालना मिळत असली तरी त्याचवेळी आयात महागात पडते. त्यामुळे महागाईची आयात केल्यासारखा प्रकार घडतो. असे होणे दीर्घ पल्ल्यात भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगले नाही. निर्यातीबरोबरच परकीय गुंतवणूक आणि अनिवासी भारतीयांनी पाठवलेल्या पैशामुळे भारताचा परकीय चलनाचा साठा वाढतो. तो आता 600 अब्ज डॉलर एवढा आहे.
दोन महिन्यापूर्वी भारताकडील परकीय चलनाचा साठा 635 अब्ज डॉलर होता. मात्र दरम्यानच्या काळामध्ये आयात वाढून निर्यात कमी झाल्यामुळे हा साठा कमी झाला आहे.निर्यात वाढल्यानंतर परकीय चलन भारतात येऊन रुपयाचे मूल्य स्थिर राहण्यास मदत होते. भारताची औषधाची निर्यात वाढत असून लवकरच भारत वर्षाला 200 अब्ज डॉलरची औषध निर्यात करेल. निर्यात वाढविण्यासाठी ऑस्ट्रेलिया, ब्रिटन इत्यादी देशाबरोबर मुक्त व्यापार करार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
आतापर्यंत आपण पुरेसे प्रयत्न न केल्यामुळे भारत जागतिक पुरवठा साखळीत सामील नाही. गेल्या सात वर्षापासून जागतिक पुरवठा साखळीत भारताला महत्त्वाचे स्थान मिळावे याकरिता भारत प्रयत्न करीत आहे. यासाठी मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला चालना दिली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून उत्पादन आधारित अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात जागतिक पातळीवर भारत पुरवठासाखळीचा अविभाज्य भाग होण्यास मदत होणार आहे.