मुंबई – अगोदर केरळमधून बाहेर देशात गेलेल्या कर्मचाऱ्याकडून केरळमध्ये मोठ्या प्रमाणात परकीय चलन पाठविण्यात येत होते. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये ही परिस्थिती बदलली असून आता महाराष्ट्रातून परदेशात गेलेल्या कर्मचाऱ्याकडून जास्त परकीय चलन भारतात पाठविले जात आहे.
पाच वर्षांपूर्वी भारतात येणाऱ्या एकूण परकीय चलनात केरळमध्ये येणाऱ्या चलनाचा वाटा 19% होता तो. आता कमी होऊन 10.2 टक्के झाला आहे. तर महाराष्ट्रात येणाऱ्या परकीय चलनाचा वाटा पाच वर्षांपूर्वी 16.7% होता तो आता 35.2% इतका झाला आहे.
केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमधील बरेच नागरिक बाहेर देशात आहेत. पाच वर्षांपूर्वी एकूण परकीय चलनात या तिन्ही राज्यांचा वाटा 42 टक्के होता. तो आता 25.1% वर आला आहे. अगोदर मध्यपूवत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये दक्षिणेकडील राज्यांचा वाटा जास्त होता. मात्र आता मध्यपूर्वेत जाणाऱ्या 50% कर्मचाऱ्यांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. करोनाच्या काळामध्ये मध्यपूर्वेत गेलेले बरेच दक्षिणेतील कर्मचारी परत आले. त्यामुळे या समीकरणावर परिणाम झाला असल्याचे दिसून येते.