मुंबई – भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई नेहमी त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘बिग बॉस मराठी’ सिझन ३ मध्ये सुद्धा स्पर्धक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. शिंगणापूर येथील शनी मंदिराच्या चौथऱ्यावरून स्त्रियांना पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी मोठं आंदोलन उभं केलं होतं. अशात त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहे.
त्या राजकारणात प्रवेश करणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. इतकंच नव्हे तर बारामती मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. वृत्तमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी निवडणूक लढविणार असल्याची इच्छा व्यक्त केली आहे. “भारतीय जनता पार्टीने तिकीट दिल्यास १०० टक्के ही निवडणूक लढेन” असंही त्यांनी म्हटलं आहे.
वृत्तमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या,’राज्यातल्या शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारचं काम ठिक सुरू आहे. खूप चांगलं काम चाललंय किंवा खूप वाईट काम सुरू आहे असं मी म्हणणार नाही. कुठल्याही एखाद्या राजकीय पक्षाने मला उमेदवारी दिली तर मी १०० टक्के बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढेन. भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षाने मला विचारलं तर मी निवडणूक लढेनच.’अशी इच्छा तृप्ती देसाई यांनी केली आहे.