मुंबई – आपल्या लावणीमुळे धुमाकूळ घालत संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील हिची लोकप्रियता दिवसेंदिवस आणखीच वाढत आहे. गौतमीची प्रसिद्धी इतकी जास्त वाढली आहे की, कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी देखील गौतमीवर भाष्य केले. इंदुरीकर महाराज म्हणाले होते “कीर्तनकारांनी 5 हजार रुपये मागितले तर काय खरं आहे त्यांचं, असं म्हणतात. पण तिकडे तिची लाख रुपये देऊन तीनच गाणी ऐकतात तसेच गौतमीला संरक्षण दिलं जातं. आम्हाला मात्र संरक्षण नसतं”. इंदुरीकर महाराजांच्या या वक्तव्यावर आता गौतमी पाटीलने प्रतिक्रिया दिली आहे.
‘गौतमी पाटील’ हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगलच चर्चेत आहे. दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही. गौतमीचा कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी, मोठी गर्दी आणि मोठा खर्च. कॉलेजवयीन तरुणाईपासून ते नोकरदार वर्गापर्यंतच्या प्रत्येकाला गौतमीच्या नृत्याची भुरळ पडते. त्यात इंदुरीकर महाराजांनी गौतमीवर कीर्तनातून भाष्य केल्यामुळे तिची चर्चा आणखी वाढली आहे.
इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर गौतमी पाटील म्हणते,”महाराजांविषयी मी काय बोलणार.. महाराजांचा गैरसमज झाला आहे ते सांगतात तेवढं मानधन नाही” असं गौतमी म्हणते. गौतमी पुढे म्हणते,”मी एवढं मानधन घेतले असते तर लोकांनी माझे कार्यक्रम ठेवले नसते. एकूण 20 जणांची आमची टीम आहे त्यात अकरा मुली आहेत. या सर्वांचा खर्च मोठा आहे. त्यामुळे मानधन आम्ही घेतो. पण महाराज सांगतात तेवढं घेत नाही. तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये कोणीही देणार नाही” असा खुलासा यावेळी गौतमीने केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त प्रसारित केले आहे.
माझ्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होत असते आणि गर्दी होत असेल तर मी संरक्षण मागणारच ना ? कोणी काहीही बोललं तर माझं काम सुरु आहे.मी मानधन किती घेते हे मला आणि आयोजकांना माहिती आहे असंही गौतमी म्हणाली. तसेच आज मी केवळ आणि केवळ प्रेक्षकांमुळेच पुन्हा उभी राहू शकले असं देखील गौतमी यावेळी म्हणाली.
काय म्हणाले होते इंदुरीकर महाराज नेमकं
इंदुरीकर महाराज म्हणाले होते,”कीर्तनकारांनी 5 हजार रुपये मागितले तर काय खरं आहे त्यांचं, असं म्हणतात. पण तिकडे तीन लाखाला तीनच गाणी ऐकतात आणि 300 पोरांच्या चडड्या फाटतात. 200 पोरांचे गुडघे फुटतात. शेतकरी तुम्ही बोलयाचे नाही. आम्ही रस्त्यावर कीर्तन करतो. आमचं जीवन वाऱ्यावर. आम्हाला काय संरक्षण आहे? आम्हाला विमा नाही. जे जे लोक खरं काम करतात त्यांचा भोंग्या करायचा. तुम्ही बधिर आहे, म्हणून चाललंय सगळं. मी गेल्यावर कळेल तुम्हाला हा काय बोलत होता..’ असं इंदुरीकर महाराज म्हणाले. यावेळी त्यांनी नाव जरी घेतलं नसलं तरी ही टोलेबाजी गौतमीसाठी होती अशी सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली होती.