छत्रपती संभाजीनगर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदार संघात राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी पक्षाने विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट केला आहे. शिंदे गटातील या घटनाक्रमावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधत शिंदेंसोबत गेलेल्या नेत्यांना विचार करण्याचा सल्ला दिला आहे. आम्ही त्यांना (भावना गवळी) तब्बल 5 वेळा खासदार केले. पण आता 10 तास थांबूनही त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे गद्दारांनी याचा विचार करावा, असे ते म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी ज्यांना खासदार केले होते, आज त्यांचेच तिकीट कापण्यात आले. अजूनही काही जणांची उमेदवारी कापली जाईल. मग या लोकांनी भाजपसोबत जाऊन काय मिळवले? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.
या लोकांनी शिवसेनेशी गद्दारी केली. उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. महाराष्ट्राशी गद्दारी केली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी माझा एक उमेदवार पडला तर मी राजीनामा देईन अशी वल्गना केली होती. पण आज तेच शिंदे आपल्या खासदारांना तिकीट मिळवून देऊ शकत नाहीत. हे हाल सध्या मिंधे गटाचे झाले आहेत. आता विधानसभा निवडणुकीत काय होईल याचा विचार 40 गद्दारांनी करावा. कारण, आता एकेकाची विकेट पडण्यास सुरुवात झाली आहे, असेही ठाकरे इशारा देत म्हणाले.
मविआचे बहुतांश उमेदवार जाहीर
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मिंधे गटासह भाजप व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला उमेदवार मिळत नाहीयेत. मुंबईत भाजपने दोनच उमेदवार जाहीर केलेत. ते सुद्धा मुंबई विरोधी आणि महाराष्ट्र द्वेष्टे आहेत. याऊलट महाविकास आघाडीने अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर केलेत. शिवसेनेचे सर्व उमेदवार जाहीर झालेत, असेही आदित्य ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.