6 जण ठार तर 12 जण गंभीर जखमी
यवतमाळ : यवतमाळमध्ये मालवाहू वाहनाची झाडाला धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. अस्थीविसर्जन करुन परत येत असताना झालेल्या अपघातात सहाजण ठार, तर 12 पेक्षा अधिक जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना कळंब आणि यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी सायंकाळी कळंब तालुक्यातील जोडमोहानजीक वाढोणा गावाजवळ ही घटना घडली.
हा अपघात सायंकाळच्या सुमारास जोडमोहा मार्गावरील वाढोना खुर्द गावाजवळ झाला. जोडमोहा येथील बाबाराव वानखडे यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यासाठी सर्व नातेवाईक कोटेश्वर येथील नदीपात्रात अस्थी विसर्जनासाठी गेले होते. दरम्यान अस्ती विसर्जनाचा कार्यक्रम आटपून ते जोडमोहाकडे परत येत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी झाडावर आदळून रस्त्याच्या कडेला असलेल्या खोलगट भागात कोसळली. या वाहनात एकूण 21 लोक प्रवास करीत होते.
या भीषण अपघातात महादेव बावनकर, किसन कळसकर, महादेव चंदनकर , वाहनचालक अमर आत्राम तिघेही राहणार जोडमोहा आणि गणेश चिंचाळकर हे पाच जण जागीच ठार झाले. तर एका मृतकाचे नाव अद्याप कळू शकलेले नाही. अपघातात इतर सहा जण गंभीर जखमी झालेत. या भीषण अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती कळताच गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. या घटनेने जोडमोहा येथे शोककळा पसरली आहे.