बिजनौर – नवा मोटर वाहन कायदा लागू झाल्यानंतर वाहन चालकांना भीती बसली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास लाखोंच्या घरात दंड भरावा लागत आहे. आता मात्र वाहतूक पोलिसांनी एका केसमध्ये हद्दच केली आहे. उत्तरप्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यामध्ये पोलिसांनी चक्क एका बैलगाडीची पावती फाडली आहे.
रियाज हसन नावाची व्यक्ती आपली बैलगाडी घेऊन शेतावर गेले आणि शेताजवळ बैलगाडी उभी काले. त्यावेळी या परिसरात पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी बैलगाडीला पाहून ग्रामस्थांजवळ चौकशी केली. त्यानंतर पोलीस बैलगाडी घेऊन रियाज हसनच्या घरी पोहचले. आणि विमा नसलेले वाहन चालविले म्हणून मोटर वाहन कायदा ८१ नुसार बैलगाडी चालकाला १ हजार रुपयांचा दंड केला.
दरम्यान, देशभरात १ सप्टेंबरपासून नवीन मोटर वाहन कायदा लागू झाला आहे. या कायद्यांतर्गत वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणावर दंडाची रक्कम आकारली जात आहे. परंतु, नवीन मोटार वाहन कायद्यात बैलगाडीवर दंड करण्याची तरतूद नाही. तरीही बिजनौर जिल्ह्यातील बैलगाडी मालकाचे दंड करण्यात आला. मात्र, पोलिसांनी नंतर ते रद्द केले.