कोल्हापूर – कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे करूळ घाटातील रस्ता खचला आहे. यामुळे कोल्हापूरहून कोकणाला जाणाऱ्या वाहतुकीवरही परिणाम झाला असून करूळ घाट 26 जुलै पर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असल्याची माहिती असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख प्रसाद संकपाळ यांनी दिली आहे. ते जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना प्रसाद संकपाळ म्हणाले, हवामान खात्यानं कोल्हापूर जिल्ह्यात चार दिवस मुसळधार पाऊस येईल असा इशारा दिला आहे. हवामान खात्याचा खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस पडायला सुरुवात झाली आहे.
गगनबावडा तालुक्यातील करूळ घाटात गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस कोसळत असून याचाच परिणाम म्हणून कोल्हापूरहून कोकणाला जोडणारा रस्ता खचला आहे. त्यामुळे घाटातून सध्या एकेरी वाहतूक सुरू होती. मात्र जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे हा घाट 26 जुलै पर्यंत बंद करण्यात आला आहे.
गगनबावडा आणि वैभववाडी पोलिस हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान घाटातील वाहतूक सुरळीत राहावी म्हणून महामार्ग पोलीसही मदतीला गेले आहेत अस संकपाळ यांनी सांगितलं आहे. दरम्यान पावसाचा जोर वाढत असून रस्त्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे तसेच घटनास्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक ही पोहोचून तपासणी करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे