सातारा – सातारा पालिकेच्या मालकीच्या कास तलावाची उंची वाढविण्यात आल्याने जलाशयाचा फुगवटा वाढला आहे. पालिकेच्या जुना बंगला परिसरापर्यंत पाणी पातळी वाढली असताना येथे पाण्यात जाण्याचा मोह पर्यटकांना आवरेनासा झाला आहे. तलाव परिसरात धोकादायक जागेचा फलक लावूनही कासच्या पाण्यात उतरून पर्यटक बेजबाबदार पध्दतीने जीवाशी खेळ करत आहेत. या परिसरात सातारा पालिकेचे कोणतेच नियंत्रण नसल्याने हुल्लडबाजीला ऊत आला असून पर्यटकांच्या बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज अधोरेखित होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कास तलाव सातारा शहराची वर्षभर तहान भागवितो. धरणाच्या भिंतीची उंची बारा मीटरपर्यंत वाढविण्यात आल्याने कासकडून बामणोलीला जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. जलाशयाची पाणी पातळी यंदा साडेसहा फुटांनी वाढली असून पाणी थेट पालिकेच्या मालकीच्या जुन्या बंगल्यात शिरले आहे. जुने काही पत्र्याचे शेड व जुने पंपिंग स्टेशनची जागा पाण्याखाली गेली आहे. पालिकेने या परिसरात धोकादायक जागा असा फलक लावून येथे पाण्यात उतरण्यास मनाई केली आहे.
मात्र ऐन दिवाळीच्या हंगामात साताऱ्यासह जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या पर्यटकांनी पाण्यात उतरून धोकादायक जलक्रीडा करण्याचा धोकादायक खेळ सुरू केला आहे. पाण्यातून जाऊन जुन्या बंगल्यामध्ये शिरण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. पाडवा व भाऊबीज या दोन दिवसात सुमारे पंधरा हजार पर्यटकांनी कास तलाव परिसराला भेट दिली आहे . पाण्याखाली गेलेल्या बामणोली रस्त्याच्या टोकाला जलाशयाच्या कोपऱ्यावर चूल मांडून सर्रास मेजवान्या केल्या जात आहेत. परिसरातील विक्रेत्यांनी पाण्यात न जाण्याची समज देऊनही पर्यटक ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतात.
पालिकेचे सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष
मध्यंतरी सिंचन विभाग व धरणाच्या बांधकामाच्या ठेकेदाराची यंत्रणा तलाव परिसरात सक्रीय असायची. मात्र आता तेथे कोणीच नसल्याने पर्यटकांना मोकळे रान मिळाले आहे. सातारा पालिकेने नेमलेले कंत्राटी सुरक्षा रक्षक कागदोपत्रीच आहेत काय ? अशी शंका घ्यायला सुद्धा जागा आहे. एकंदर कास तलावाची सुरक्षा व्यवस्था अगदीच रामभरोसे असल्याची परिस्थिती आहे. मूळ मालकी असणाऱ्या सातारा पालिकेने कास तलावाच्या सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष करावे ही खेदाची बाब असल्याच्या प्रतिक्रिया पर्यटकांमधूनच व्यक्त होत असून मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी हा प्रश्न तत्काळ सोडवावा अशी अपेक्षा आहे.
हुल्लडबाजीला आवर घालण्याची गरज
जलाशयाच्या किनारा परिसरात मोठया प्रमाणावर गाळ साचला असून तेथे मोठी दुर्घटना होऊ शकते. मात्र पर्यटकांची हुल्लडबाजी मात्र थांबायला तयार नसते. विशेषतः परजिल्ह्यातून आलेल्या पर्यटकांचा अतिउत्साह धोकादायक ठरण्याची भीती आहे. रस्त्यावर वाहने पार्क करणे किंवा वाहन थेट जलाशयाच्या काठापर्यंत आणणे असे धोकादायक प्रकार सर्रास सुरू असून यामधून एखादी दुर्घटना घडून हा खेळ जीवाशी बेतू शकतो. त्यामुळे कास परिसरात आता सुरक्षा यंत्रणा तैनात करण्याची गरज व्यक्त होत आहे.