बॉलीवूडमधील क्रमांक एकची नायिका कोण, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असेल. पण मंडळी या अव्वल स्थानाच्या खुर्चीवर आलिया भटने कब्जा केलेला दिसत आहे. कंगना, दीपिका यांसारख्या नायिकांनंतर आता सिनेसृष्टीत आलियाचेच नाव घेतले जात आहे. आलियाने नुकतीच “गंगूबाई काठियावाडी’ या संजय लीला भन्साळींच्या चित्रपटाचे चित्रीकरण आटोपले आहे.
यासोबतच आलियाचा “ब्रह्मास्र’ हा चित्रपटही याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. पण आलियाच्या तोंडी सध्या “गंगुबाई’चेच नाव आहे. ती म्हणते, “माझ्या सर्वांत आवडत्या दिग्दर्शकासोबत मी काम केलं आहे, यावर माझा विश्वासच बसत नाहीये. मी खरं सांगतेय चित्रीकरणादरम्यान केवळ आणि केवळ मी त्यांना फॉलो करत होते. कित्येकदा ते मला विचारायचे “हा सीन कसा झाला’? मी “छान झाला’ असं म्हटल्यानंतर ते हसून मला सांगायचे की नाही अगं. तो पुन्हा शूट करावा लागेल. असं म्हणून ते दोन-तीन वेळा टेक घ्यायचे आणि मग ओके द्यायचे.
‘ “गंगुबाई’मुळे आलियाला एक वेगळी ओळख मिळाली आहे. 26 वर्षांची ही नायिका आता आपल्या ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन आयुष्यावरुन चर्चेत असते. त्यातील प्रत्येक प्रश्नांची ती उत्तरेही देते. ती म्हणते, “माझ्या मनातील लहान मूल नेहमी बाहेर येण्याचा प्रयत्न करत असत. अयान मुखर्जी यांच्या “ब्रह्मास्र’च्या शूटिंगदरम्यान मला ही बाब प्रकर्षानं जाणवली. वास्तविक अभिनयाच्या दृष्टीनं ते अत्यंत अयोग्य आहे.
किंबहुना, कलाकाराची कोणतीही इमेजच असू नये. मला व्हर्सेटाईल बनायचे आहे. यासाठी दिग्दर्शकही मला मदत करत आहेत. थोडंसं वेगळं काहीतरी केल्याशिवाय “लंबी रेस का घोडा’ बनणं अशक्य आहे, हे मला माहीत आहे. आलियाचे विचार, तिचे बोलणे आणि अभिनय या सर्वांमधून तिची प्रगल्भता दिसून येत आहे. त्यामुळेच ती सध्या अव्वल स्थानावर आहे असं अनेकांचं मत आहे.